नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खेळांचा समावेश आहे. हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही आता समावेश असेल. याविषयी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, ‘‘देशी खेळांचा समृद्ध वारसा भारताला लाभलेला आहे. त्यामुळे या खेळांचे रक्षण करणे तसेच त्यांचा प्रसार करून हे खेळ लोकप्रिय करण्याचे क्रीडा मंत्रालयाचे धोरण असेल. या खेळातील खेळाडूंना खेलो इंडिया स्पर्धेसारखे दुसरे चांगले व्यासपीठ असूच शकत नाही. पुढील खेलो इंडियामध्ये योगासनासहित या चार खेळांचा समावेश असेल. त्यामुळे क्रीडाप्रेमींचे या स्पर्धेकडे लक्ष लागले आहे. येत्या काही वर्षांत आणखीन काही देशी खेळांचा खेलो इंडिया स्पर्धेत समावेश करण्यात येईल.’’ कलरीपायूट्टू हा खेळ प्रामुख्याने करळमध्ये खेळला जात असून मल्लखांब हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसहित संपूर्ण भारतात खेळला जातो. गटका पंजाबमध्ये खेळला जात असून थांग-ता हा मणिपूर मार्शल-आर्टवर आधारित आहे.