नवी दिल्ली : कर्नाटकचा कर्णधार मयांक अगरवाल ग्वाल्हेर येथे एक मार्चपासून मध्य प्रदेशविरुद्ध सुरू होणाऱ्या इराणी चषकासाठी शेष भारताचे नेतृत्व करणार आहे. अगरवाल नुकत्याच झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. कसोटी संघात पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेला अगरवाल अभिमन्यु ईश्वरनसह डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. हा सामना सुरुवातीला इंदूर येथे होणार होता. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीमुळे हा सामना ग्वाल्हेर येथे स्थानांतरित करण्यात आला. शेष भारताची फलंदाजी अगरवाल आणि ईश्वरन यांच्याशिवाय सुदीप कुमार घरामी, यशस्वी जैस्वाल, बी इंद्रजीत आणि यश धुल यांच्यावर अवलंबून असेल. रणजी विजेत्या सौराष्ट्र संघाचा यष्टीरक्षक फलंदाक हार्विक देसाई आणि गोलंदाज चेत सकारिया यांनाही शेष भारत संघात स्थान मिळाले आहे. संघाच्या गोलंदाजीची मदार मुकेश कुमार, आकाश दीप, सकारिया व नवदीप सैनी यांच्यावर असेल. आदित्य श्रीवास्तवच्या अनुपस्थितीत मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक-फलंदाज हिमांशु मंत्री करेल. मध्य प्रदेशने गेल्या वर्षी जूनमध्ये रणजी करंकड पटकावला होता. त्या वेळी संघात सहभागी असलेल्या रजत पाटीदार, वेंकटेश अय्यर, आवेश खान, शुभम शर्मा आणि यश दुबे यांना यावेळीही स्थान देण्यात आले आहे. संघ : ’शेष भारत : मयांक अगरवाल (कर्णधार), सुदीप कुमार घरामी, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, हार्विक देसाई, मुकेश कुमार, अतीत सेठ, चेतन सकारिया, नवदीप सैनी, उपेंद्र यादव, मयंक मरकडेय, सौरभ कुमार, आकाश दीप, बी इंद्रजीत, पुलकित नारंग, यश धुल ’ मध्य प्रदेश : हिमांशु मंत्री (कर्णधार), रजत पाटीदार, यश दुबे, हर्ष गवली, शुभम शर्मा, वेंकटेश अय्यर, अक्षत रघुवंशी, अमन सोलंकी, कुमार कार्तिकेय, सारांश जैन, आवेश खान, अंकित कुशवाह, गौरव यादव, अनुभव अगरवाल, मिहीर हिरवाणी दुखापतीमुळे सर्फराज इराणी चषकाबाहेर कोलकाता : मुंबईचा तारांकित फलंदाज सर्फराज खान दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरात झालेल्या दुखापतीमुळे इराणी चषकाच्या बाहेर पडला आहे. या चषकात सर्फराज शेष भारताचे प्रतिनिधित्व करणार होता. सर्फराजने रविवारी इडन गार्डन्सवर सराव सामन्यात सहभाग नोंदवला नाही.