‘पद्म’ सन्मानाबाबत सायना नेहवालने शासकीय प्रक्रियेबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवरून झालेल्या वादंगात पडण्याची माझी इच्छा नाही, असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने सांगितले. मी एखादा सन्मान मिळावा म्हणून कधीच खेळलो नाही. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देणे हीच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, असे म्हटले आहे.
नारंग पुढे म्हणाला की, ‘‘या सन्मानाबाबत शासनाच्या निर्णयाची मी वाट पाहत आहे. या वादापासून अलिप्त राहणेच माझ्यासाठी योग्य आहे.’’
नारंगने २०१० मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारातून तीन वेळा डावलल्याबद्दल जाहीरपणे टीका करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती.
पद्मभूषण सन्मानाविषयी विचारले असता नारंग म्हणाला, ‘‘हा सन्मान मिळण्यासाठी मी खूपच तरुण आहे. जर यंदा हा सन्मान मिळाला नाही तर आणखी एक-दोन वर्षांमध्ये मला हा मान निश्चित मिळेल. सध्या मी आगामी जागतिक स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे.’’