चेन्नई, हैदराबाद तसेच मोहाली कसोटीत पराभवाला सामोरा गेलेला मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात कमकुवत संघ असल्याचे उद्गार भारताचा माजी फिरकीपटू नीलेश कुलकर्णीने काढले. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंचे साधारण प्रदर्शनच त्यांच्या पराभवाचे कारण असल्याचेही त्याने सांगितले.
तीन कसोटी सामन्यांतील कामगिरी बघता हा ऑस्ट्रेलियाच्या कमकुवत संघापैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाचे फिरकी आक्रमण अननुभवी आहे. फलंदाजांसाठी शतक झळकावणे महत्त्वाचे असते तसेच फिरकीपटूसाठी डावात पाच बळी टिपणे संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावू शकते. मात्र सध्याचा ऑस्ट्रेलियन संघ फिरकी आक्रमणात अत्यंत कमजोर आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताच्या फिरकीपटूंनी शानदार प्रदर्शन केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणातला हा कमकुवत दुवा भारतासाठी मात्र फायदेशीर ठरला आहे.  गोलंदाज जर २० विकेट्स घेऊ शकत नसतील तर कसोटी जिंकणे कठीण असते. भारतात जर फिरकी गोलंदाज २० विकेट्स घेऊ शकत नसतील तर संघाला जिंकणे अधिकच कठीण होऊन बसते, असे नीलेशने पुढे सांगितले.