Duleep Trophy 2024 Updates India B beat India A by 76 runs : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारत ब संघाने भारत अ संघाचा ७६ धावांनी पराभव केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत अ संघासमोर विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य होते, परंतु प्रत्युत्तरात ते १९८ धावा करून सर्वबाद झाले. अशाप्रकारे अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील भारत ब संघाने दुलीप ट्रॉफीमध्ये विजयाने सुरुवात केली आहे. भारत ब संघाच्या या विजयात युवा फलंदाज मुशीर खान आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी अप्रतिम कामगिरी केली. मुशीरने पहिल्या डावात संघासाठी १८१ धावांची दमदार खेळी केली होती, तर दुसऱ्या डावात ऋषभ पंतने ६१ धावांचे योगदान दिले.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारत ब संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत ‘अ’च्या गोलंदाजांनी जोरदार सुरुवात केली आणि अवघ्या ७६ धावांत भारत ‘ब’चे ८ विकेट्स घेतल्या, पण त्यांना मुशीर खानला बाद करताना घाम फुटला. मुशीरच्या १८१ धावांच्या खेळीमुळे भारत ब संघाने पहिल्या डावात ३२१ धावा केल्या. डावाच्या अखेरीस नवदीप सैनीनेही अर्धशतक झळकावत शुबमन गिलच्या अडचणी वाढवल्या.
भारत ब विरुद्धच्या पहिल्या डावात ३२१ धावांच्या प्रत्युत्तरात भारत अ संघाची फलंदाजी अतिशय सामान्य होती. तनुष कोटियनने संघाकडून सर्वाधिक ३२ धावा केल्या. अशा प्रकारे संपूर्ण संघ पहिल्या डावात २३१ धावांवरच गारद झाला. अशा स्थितीत भारत ब संघाला पहिल्या डावात ९० धावांची भक्कम आघाडी मिळाली. भारत ब संघाकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
यानंतर भारत ब संघाची दुसऱ्या डावात खूपच खराब सुरुवात झाली. संघाने अवघ्या २२ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या, परंतु येथून सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली, ज्यामुळे संघाने जोरदार पुनरागमन केले. मात्र, मधल्या फळीत फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केल्यामुळे भारत ब संघाला दुसऱ्या डावात १८४ धावा करता आल्या. मात्र, पहिल्या डावातील आघाडीमुळे भारत अ संघाला कठीण लक्ष्याचा सामना करावा लागला.
भारत ब संघासाठी आकाशदीपने गोलंदाजीत केली कमाल –
वेगवान गोलंदाज आकाशदीपने गोलंदाजीत आपली जादू दाखवली. आकाशदीपने पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावात मिळून एकूण ९ विकेट्स घेतल्या. मात्र, असे असूनही भारत अ संघाला विजय मिळवता आला नाही. भारत अ संघाच्या बाजूने, आकाशदीप सिंग हा एकमेव खेळाडू होता, ज्याने आपल्या कामगिरीने प्रभावित केले. याशिवाय अन्य कोणताही खेळाडू कामगिरी करू शकला नाही.
© IE Online Media Services (P) Ltd