भुवनेश्वर : नागपूरच्या १६ वर्षीय दिव्या देशमुखने ५८व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचे जेतेपद पटकावले. किशोरवयातच राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी ती पाचवी बुद्धिबळपटू ठरली आहे. वसंती (१९७४), जयश्री (१९७५) आणि रोहिणी (१९७६) या खाडिलकर भगिनींव्यतिरिक्त कोनेरू हम्पीने २००३मध्ये असा पराक्रम केला होता. २०१९च्या राष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने कांस्यपदकाची कमाई केली होती. दिव्याने नवव्या फेरीअंती सर्वाधिक आठ गुण कमावून पहिल्या राष्ट्रीय जेतेपदावर मोहोर उमटवली. नवव्या फेरीत दिव्याने सौम्या स्वामीनाथनला १८ चालींमध्ये बरोबरीत रोखले. महाराष्ट्राच्या साक्षी चितलांगेला दुसऱ्या, तर आंध्र प्रदेशच्या प्रियंका नुटाक्कीला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. दिव्याने विविध वयोगटांतील २४ स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना १७ सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्यपदकांवर नाव कोरले आहे.