वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला पुढील महिन्यात बंगळूरु येथे होणाऱ्या पहिल्या ‘एनसी क्लासिक’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याने आपल्याला द्वेष आणि शिवीगाळ याचा सामना करावा लागत आहे. माझ्या कुटुंबालाही यात ओढण्यात आले. देशाप्रति असलेल्या निष्ठेवर आणि प्रेमावर अशा प्रकारे प्रश्न उपस्थित होणे हे दुर्दैवी आहे, अशी भावना भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने व्यक्त केली.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीनच बिघडले आहेत. याचे पडसाद केवळ राजकीय स्तरावर नाही, तर क्रीडाक्षेत्रातही उमटत आहेत. नीरज चोप्राच्या नावाने २४ मे रोजी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेचे पहिलेच वर्ष असल्याने त्यात केवळ भालाफेक हा क्रीडाप्रकार खेळला जाईल. जगभरातील आघाडीच्या भालाफेकपटूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा अशी नीरजची इच्छा होती. त्यामुळे त्याने गतवर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमलाही या स्पर्धेसाठी आमंत्रित केले होते. पहलगाम येथील हल्ल्यामागे पाकिस्तानी अतिरेकी असल्याची प्राथमिक माहिती समोर असल्यानंतर शेजारी देशाबाबतचा राग अधिकच तीव्र झाला. नदीमला भारतात आमंत्रित करण्यावरून देशाला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजला लक्ष्य करणेही काहींनी कमी केले नाही.
‘‘सहसा मी फार बोलत नाही. मात्र, माझ्या देशावरील प्रेमावर कोणी प्रश्न उपस्थित केले आणि माझ्या कुटुंबाचा अनादर केला, तर मी शांत बसणार नाही. ‘नीरज चोप्रा क्लासिक’ स्पर्धेत खेळण्यासाठी अर्शद नदीमला आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबाबत बरीच चर्चा केली जात आहे. मला द्वेष आणि शिवीगाळ याचा सामना करावा लागत आहे. जे लोक हे करत आहेत, त्यांनी माझ्या कुटुंबालाही यात ओढले आहे,’’ असे नीरजने समाजमाध्यमांवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
‘‘अर्शदला मी जे आमंत्रण दिले, ते एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूसाठी होते. त्यात कोणताही चुकीचा हेतू नव्हता. ‘एनसी क्लासिक’ स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंना भारतात आणणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही सर्व खेळाडूंना सोमवारीच (२१ एप्रिल) आमंत्रण पाठवले होते. त्यानंतर दोन दिवसांनी पहलगाम येथील दुर्दैवी घटना घडली. गेल्या ४८ तासांत जे घडले, त्यानंतर अर्शदने ‘एनसी क्लासिक’ स्पर्धेत खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझा देश आणि देशाचे हित सर्वांत महत्त्वाचे आहे,’’ असेही नीरजने नमूद केले.
‘‘अनेक वर्षांपासून अतिशय अभिमानाने मी देशाची सेवा करत आहे. त्यामुळे देशाप्रति माझ्या निष्ठेवर अशा प्रकारे प्रश्न उपस्थित होणे हे दुर्दैवी आणि दु:खद आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय मला आणि माझ्या कुटुंबाला द्वेष देणाऱ्यांसमोर स्वत:ची बाजू मांडवी लागणे, याचाही मला खूप त्रास होत आहे. आम्ही फार साधे लोक आहोत आणि आम्हाला त्यापेक्षा वेगळे दाखवायचा कृपया प्रयत्न करू नका,’’ असेही आपल्या निवेदनात नीरज म्हणाला. नीरज भारतीय सैन्यात सुभेदार मेजरही आहे.
सिंधूकडून पाठिंबा
तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने नीरजला पाठिंबा दर्शविला. ‘‘नीरज, तू माणूस म्हणून किती साधा, सभ्य आणि इतरांचा आदर करणारा आहेस, हे मी जाणते. तुझे देशावर फार प्रेम आहे आणि तू देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. तू नकारात्मक गोष्टींकडे फार लक्ष देऊ नकोस. काळजी घे,’’ असे सिंधूने लिहिले.
आईलाही लक्ष्य…
नीरजची आई सरोज यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजला मागे टाकत अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर सरोज यांनी नदीमही माझ्या मुलासारखा असल्याची भावना व्यक्त केली होती. ‘‘लोक आपले मत इतके सहजपणे बदलतात याचे मला आश्चर्य वाटते. वर्षभरापूर्वी माझ्या आईने निष्पापपणे जेव्हा टिप्पणी केली होती, तेव्हा तिच्या विचारांचे खूप कौतुक झाले होते. आता त्याच विधानावरून तिला लक्ष्य केले जात आहे,’’ असे नीरज म्हणाला.