आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीत भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या दणदणीत विजयानंतर संपूर्ण देशभरातून टीम इंडियाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, या सामन्यानंतर भारतीय संघदेखील चांगलाच आनंदात असून खेळाडू वेगवेगळ्या माध्यमातून हा विजय साजरा करत आहेत. असे असताना भारत-पाक यांच्यात सामना झाल्यानंतर भारताचे दोन धडाकेबाज गोलंदाज अर्शदीप सिंह आणि आवेश खान एक मजेशीर खेळ खेळताना दिसले आहेत. त्यांनी या खेळाला ‘एम गेम’ (Aim Game) असं नाव दिलंय.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे नेमकं काय? ज्याचा फटका भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांना बसला

दोघांमध्ये रंगला सामना

भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी एक मजेशीर खेळ खेळला. त्यांनी टेबल टेनिसच्या टेबलवर एका बाजूने काही रिकामे ग्लास ठेवले. तर दुसऱ्या बाजूला उभे राहात या दोन्ही खेळाडूंनी ग्लासमध्ये छोटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. ग्लासमध्ये चेंडू गेल्यास तो गोल समजण्यात आला. या मजेशीर खेळामध्ये पंचाची भूमिका सूर्यकुमार यादवने पार पाडली.

हेही वाचा >>> आईचे निधन झाले तरी तो खेळत राहिला, भारतीय फलंदाजांना अडचणीत आणणाऱ्या पाकिस्तानी नसीमने केलेला आहे मोठा संघर्ष

या खेळात आवेश खानने एक गोल केला तर आर्शदीप सिंगने दहा चेंडूंपैकी दोन चेंडू बरोबर ग्लासमध्ये फेकले. दोन गोल केल्यामुळे पंच सूर्यकुमार यादवने अर्शदीपला विजयी ठरवलं. या मजेशीर खेळाचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा >>> “…तर भारत जिंकलाच नसता,” टीम इंडियाला नशिबाने साथ दिली म्हणताच पाकिस्तानी पत्रकारावर भडकले क्रिकेटप्रेमी

दरम्यान, भारताची आगामी लढत ३१ ऑगस्ट रोजी हाँगकाँगविरोधात होणार आहे. या सामन्यात विजय झाल्यास भारताची आणखी एकदा पाकिस्तानविरोधात लढत होऊ शकेल. मात्र त्यासाठी पाकिस्तानलादेखील त्यांच्या आगामी सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.