१४ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध रोमांचक पद्धतीने विजय मिळवला होता. २० षटकांनंतर दोन्ही संघात हा सामना टाय झाला. त्यानंतर ‘बॉल आऊट’ पद्धतीने सामन्याचा निकाल ठरवण्यात आला. ही घटना २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपच्या उद्घाटनाच्या हंगामात घडली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला १४१ धावांवर रोखले. मात्र, भारतीय गोलंदाजांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत पाकिस्तानला इतक्याच धावसंख्येवर पोहोचू दिले.

यानंतर बॉल आऊटद्वारे मॅचचा निर्णय घेण्यात आला. बॉल आऊटमध्ये दोन्ही संघांना स्टम्पला लक्ष्य करण्याची संधी देण्यात आली. भारताकडून वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनी अचूक लक्ष्य भेदले. तर पाकिस्तानच्या यासीर अराफाक, उमर गुल आणि शाहिद आफ्रिदीने संधी गमावली. भारताने हा सामना ३-० च्या फरकाने जिंकला.

हेही वाचा – ‘‘मला लीगमध्ये खेळायचं होतं, पण…”, इंग्लंडच्या खेळाडूनं सांगितलं IPLमधून माघार घेण्याचं खरं कारण

उथप्पाने या विजयाचे श्रेय धोनी आणि गोलंदाजी प्रशिक्षक वेंकटेश प्रसाद यांना दिले होते. उथप्पा म्हणाला, ”बॉल आऊट करताना धोनी विकेटच्या जवळ उभा राहिला, ज्यामुळे संघाला फायदा झाला. तर पाकिस्तानी यष्टीरक्षक कामरान अकमल विकेटपासून खूप दूर होता. भारताने सामन्यापूर्वी बॉल आऊटचा अनेक वेळा सराव केला होता. प्रत्येक वेळी सराव करताना फलंदाजांनी गोलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली.

 

मास्टरमाईंड धोनी

”एमएस धोनीने केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींपैकी ही एक होती. त्याने स्टम्पच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी यष्टीरक्षक (कामरान अकमल) उभा होता, जिथे यष्टीरक्षक सहसा उभा असतो. पण धोनी यष्टीच्या अगदी मागे उभा राहिला आणि त्यामुळे आमच्यासाठी गोष्टी खूप सोप्या झाल्या. आम्हाला फक्त धोनीला पाहून गोलंदाजी करायची होती आणि त्यामुळे आम्हाला स्टम्पला लक्ष्य करण्याची उत्तम संधी मिळाली. नेमके तेच आम्ही केले”, असे उथप्पाने सांगितले.

भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात पाकिस्तानला मात देत टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरले. इथूनच धोनीची विजयगाथा सुरू झाली आणि पुढे त्याने २०११चा वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.