मुंबई : भारत-न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी सर्वसामान्य चाहत्यांच्या वाटय़ाला दोन हजार तिकिटेच येणार आहेत, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) विश्वसनीय सूत्रांनी दिली. करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर घालण्यात आलेल्या नियमांमुळे ३ डिसेंबरपासून होणाऱ्या या सामन्यासाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी २५ टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. वानखेडेची प्रेक्षकक्षमता ३३ हजार इतकी आहे. मात्र शासनाच्या नियमांनुसार ८,५०० तिकिटेच प्रत्यक्षात उपलब्ध असतील. ‘एमसीए’शी संलग्न असलेले ३२९ क्लब्स, माजी क्रिकेटपटू यांसाठी राखीव तिकिटे ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय गरवारे क्लबसाठी दीड हजार, संघटना आणि जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक हजार तिकिटे देण्यात येणार आहेत. त्यामुळे दर्दी क्रिकेटप्रेमींना उरलेल्या दोन ते अडीच हजार तिकिटांची नोंदणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पाच वर्षांनी प्रथमच वानखेडेवर कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी २०१६मध्ये भारत-इंग्लंड यांच्यात येथे कसोटी खेळवण्यात आली होती. त्याशिवाय जानेवारी, २०२०नंतर प्रथमच वानखेडेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे अखेरचा एकदिवसीय सामना झाला होता.