कर्णधार बाबर आझम (४२५ चेंडूंत १९६ धावा) आणि यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान (१७७ चेंडूंत नाबाद १०४) यांच्या शतकांमुळे पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राखण्यात यश आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद ५५६ धावांवर घोषित केल्यानंतर पाकिस्तानला १४८ धावांत गुंडाळले होते. मात्र, त्यांनी फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी केली. त्यांनी हा डाव २ बाद ९७ धावांवर घोषित करत सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानपुढे ५०६ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानने जवळपास दोन दिवस फलंदाजी करताना तब्बल १७१.४ षटके खेळून काढली. त्यांची २ बाद २१ अशी स्थिती असताना आझम आणि अब्दुल्ला शफीक (९६) यांनी पाकिस्तानला सावरले. मग पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात त्यांनी तीन बळी झटपट गमावले. मात्र, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी तीन बळींची आवश्यकता असताना रिझवानने शतक झळकावल्याने पाकिस्तानने सामना अनिर्णित राखला. या मालिकेतील तिसरा सामना सोमवारपासून (२१ मार्च) खेळला जाईल.