Asia Cup 2022 : आशिया चषकात आज पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग यांच्यात शारजाह येथे साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने हॉंगकॉंगवर १५५ धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत हॉंगकॉंगपुढे १९४ धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र, हॉंगकॉंगला ३८ धावांपर्यंतच मजल मारता आली. दरम्यान, या विजयानंतर सुपर ४ मध्ये भारत-भारत पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार आहे.

पाकिस्तानप्रमाणेच हॉंगकॉंगच्या डावाची सुरूवातही खराब राहिली. ३० धावांच्या आतच हॉंगकॉंगचे ५ खेळाडू तंबूत परतले होते. हाँगकाँगच्या निझाकत खानने सर्वाधिक ८ धावा केल्या. तर ऐजाज खान हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने ३ षटकात सर्वाधिक ४४ धावा दिल्या. तर एहसान खानने ४ षटकात २८ धावा देत २ बळी घेतले.

हेही वाचा – Asia Cup 2022 : सुपर ४ सामन्यांपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर

दरम्यान, हॉंगकॉंगने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या डावाची सुरूवात खराब राहिली. पाकिस्तानची धावसंख्या १३ वर असताना कर्मधार बाबर आझम स्वस्तात परतला. त्याने ८ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ९ धावा काढल्या. त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि फकर झमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद रिझवाने अर्धशतक झळकावत ५७ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. तर फकर झमनने ४१ चेंडूत ५३ धावा केल्या.

हेही वाचा – Asia Cup 2022 : ड्रेसिंग रुममधून दिलेल्या संदेशाबाबत श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा, म्हणाले, “तो संदेश…”

भारत पाकिस्तान पुन्हा आमने-सामने

पाकिस्तान आणि हॉंगकॉंग या दोन्ही देशांसाठी आजचा सामना ‘करो या मरो’ या स्थितीत होता. या सामन्यात पाकिस्ताने बाजी मारत हॉंगकॉंगचा १५५ धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सुपर ४ मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. रविवारी ४ सष्टेंबर रोजी दोन्ही संघ पुन्हा एकमेकांविरोधात मैदानात उतरलेले पहायला मिळतील.