नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या भारतीय बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपला आगामी विश्व अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पध्रेतील विजेतेपदाचे वेध लागले आहेत.
ग्लासगोमध्ये पराक्रम दाखवून कश्यप मंगळवारी मायदेशी परतला. ११ दिवसांच्या स्पध्रेनंतर आता थोडी विश्रांती घेऊन डेन्मार्कला जाण्यासाठी त्याला सज्ज व्हावे लागणार आहे. याबाबत कश्यप म्हणाला, ‘‘मी नेहमीच थोडय़ा कालावधीतील लक्ष्य समोर ठेवतो. सध्या विश्व अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पध्रेची आव्हाने माझ्यासमोर आहेत. या दोन स्पर्धासाठी मला तंदुरुस्त राहण्याची आवश्यकता आहे.’’
राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत ३२ वर्षांनी पुरुषांचे सुवर्णपदक जिंकून देणारा २७ वर्षीय कश्यप हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला. हैदराबादच्या कश्यपने प्रकाश पदुकोण आणि सय्यद मोदी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत हा इतिहास घडवला. १९७८ मध्ये पदुकोण यांनी कॅनडाला झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत ही किमया साधली होती, तर चार वर्षांनी मोदी यांनी त्या यशाची पुनरावृत्ती केली होती.
या पदकाचे आयुष्यातील महत्त्व विशद करताना कश्यप म्हणाला, ‘‘हे पदक माझ्यासाठी सर्व काही आहे. माझ्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे यश आहे. त्यामुळेच माझ्या आनंदाला पारावार नाही.’’