खेळ कोणताही असो, पण जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ समोरासमोर असतात तेव्हा ती स्पर्धा एक वेगळ्या स्तरावर पोहोचते. जर क्रिकेटचे मैदान असेल तर चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. आता क्रिकेटप्रेमींची ही प्रतीक्षा संपणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ २४ ऑक्टोबर रोजी आमनेसामने असतील. त्याचा रोमांच विजेतेपदापेक्षा कमी नसेल, एवढे नक्की.

जेव्हाही दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असतात, तेव्हा खेळाडूही सामना जिंकण्यासाठी सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतात. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानी खेळाडूंना बंपर ऑफर दिली आहे. ”टी-२० विश्वचषकात भारताचा पराभव केल्यावर पाकिस्तानी खेळाडूंना एक कोरा चेक देण्यात येईल”, असे राजा यांनी सांगितले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राजा म्हणाले, ”एका मोठ्या गुंतवणूकदाराने मला सांगितले आहे, की पीसीबीसाठी कोरा चेक तयार आहे. आगामी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताचा पराभव करण्यात यश आले तर ते हा चेक देतील.” विश्वचषकात दोन्ही संघ १२ वेळा आमनेसामने आले आहेत. या दरम्यान, दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषकात ७ वेळा आणि टी-२० विश्वचषकात ५ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. आजपर्यंत पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये भारताला हरवू शकलेला नाही.”

हेही वाचा – कोलकातानं राजस्थानला धक्का दिल्यानंतर ट्वीटरवर मीम्सचा पाऊस; मुंबईकर चाहत्यांमुळे ‘अंबानी’ चर्चेत

राजा पुढे म्हणाले, ”पीसीबी ५० टक्के आयसीसीच्या निधीतून चालवले जाते. त्याचबरोबर आयसीसीला भारताकडून ९० टक्के निधी मिळतो. मला भीती वाटते की जर भारताने आयसीसीला निधी देणे बंद केले, तर पीसीबी पूर्णपणे नष्ट होऊ शकते. पीसीबी नंतर आयसीसीला ‘शून्य’ निधी देते. पीसीबी मजबूत करण्यासाठी मी वचनबद्ध आहे.”