बचावपटूंनी शेवटच्या सेकंदांमध्ये केलेल्या चुकीचा फायदा घेत बंगाल वॉरियर्सने अहमदाबाद पर्वातल्या अखेरच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युनजाएंटविरोधात बरोबरी साधली. घरच्या मैदानावर सलग ५ सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात विजय मिळवत विजयाचा षटकार मारण्याचा गुजरातच्या संघाचा मानस होता. त्या दिशेने वाटचालही सुरु होती, मात्र शेवटच्या सेकंदांमध्ये बचावपटूंनी केलेली एक चूक बंगालच्या पथ्थ्यावर पडली आणि सामना २६-२६ अशा बरोबरीत सुटला.

गुजरातकडून दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून आलेल्या महेंद्र रजपूतने आपल्या सुपर रेडमधून सामन्याचं पारडं गुजरातच्या बाजूने झुकवलं. शेवटच्या काही सेकंदांमध्ये गुजरातकडे एका गुणाची आघाडी होती. त्याला सचिनने ८ आणि कर्णधार सुकेश हेगडने ६ गुण मिळवत चांगली साथ दिली होती. मात्र अखेरच्या सेकंदांमध्ये बचावपटूंची एक चूक गुजरातला महागात पडली.

अवश्य वाचा – कर्णधाराचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडतोय!

दुसरीकडे बंगाल वॉरियर्सच्या संघाने आज बऱ्याच प्रमाणात सर्वसमावेशक खेळ केला. चढाईपटूंमध्ये मणिंदर सिंहने ४, जँग कून लीने ३ गुण मिळवले. मात्र या सगळ्यांमध्ये हिरो ठरला तो दिपक नरवाल. दिपने आजच्या सामन्यात ९ गुणांची कमाई करत बंगालचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं होतं. त्याला दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून आलेल्या भूपिंदर सिंहनेही चांगली साथ दिली. दिपक नरवालने दाखवलेल्या समयसुचकतेमुळेच बंगालला हा सामना बरोबरीत सोडवण्यात यश आलं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – दबंग दिल्लीच सरस, चुरशीच्या सामन्यात तामिळवर एका गुणाने मात