टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनचं चार वर्षानंतर टी २० संघात पुनरागमन झालं आहे. अश्विनने यापूर्वी अखेरचा टी २० सामना जून २०१७ मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध खेळला होता. ३४ वर्षीय अश्विननं आतापर्यंत भारतासाठी ४६ टी २० सामन्यात ५२ गडी बाद केले आहेत. यात ८ धावा देऊन चार गडी बाद केल्याचं त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ कसोटी सामन्यात आर. अश्विनला संधी मिळालेली नाही. आता मालिकेतील शेवटचा सामना उरला आहे. या सामन्यापूर्वी फिरकीपटू आर. अश्विननं कर्णधार विराट कोहलीसह चांगलाच घाम गाळला. शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर. अश्विन गोलंदाजीसोबत फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

भारतीय संघात विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी २० विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे.

Squad for ICC Men’s T20 World Cup – Virat Kohli, Rohit Sharma, KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant, Ishan Kishan, Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami: BCCI pic.twitter.com/yoSd9SMBlZ

— ANI (@ANI) September 8, 2021

भारतात होणारा टी २० वर्ल्डकप करोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या स्पर्धेस्ठी १५ खेळाडू आणि ८ अधिकाऱ्यांना आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.