पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या कम्युनिटीबद्दल सोशल मीडियावर युजर्सनी कमेंट केली होती. त्यानंतर विराट कोहली मोहम्मद शमीच्या मदतीला आला. त्यानंतर काही लोकांनी विराट कोहलच्या ९ महिन्यांच्या मुलीवर देखील अर्वाच्य भाषेत कमेंट केली. 

विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबासाठी केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटनंतर सोशल मीडियावर लोक विराटच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत आहेत. या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाने (DWC) दखल घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली असून अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस देताना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी कर्णधार विराट कोहलीला ट्वीट करत धीर दिला आहे. राहुल गांधी म्हणाले, “प्रिय विराट, हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा आणि तुम्ही टीम इंडियाचे रक्षण करत राहा.