भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधित कागदपत्रे काल (गुरूवार) ईडी समोर सादर केली. यावेळी कारखान्याचे तत्कालीन पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील भूमिका मांडली आहे. जरंडेश्वर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत मग फक्त जरंडेश्वरच टार्गेट का?, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना विचारला आहे. हे साखर कारखाने शेतकऱ्यांना मिळणार का? असे देखील शेट्टी म्हणाले. गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन् सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायच ही पद्धत सध्या सुरु आहे, असा टोला देखील त्यांनी किरीट सोमय्या यांना लगावला. राजू शेट्टी म्हणाले, "मी सहा वर्षापूर्वी हेच सांगत होतो. गैरव्यवहार झालेल्या कारखान्यांची यादी फार मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत. मी महाविकास आघाडीवर नाराज अन् भाजपा सरकारवर खुश, अस काही नाही. माझी वाटचाल अशीच असणार,जो आडवा येईल. त्याला तुडवायचं हे धोरण आहे." १९ ऑक्टोबरला जयसिंगपूरला ऊस परिषद झाली. त्यात काही ठराव झाले त्याची प्रत आयुक्तांना देण्यात आली. साखर कारखान्यांना एक रकमी एफआरपी देण्यात यावी. डिसेंबरमध्ये तीन हजार तीनशे एवढी द्यावी व राहिलेली रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी. ती तुकड्या तुकड्यात दिला जाते. १३ महिने पैसे राहतात त्याच्या व्याजाच काय झाल? असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारने साखरेचे भाव ३७ रुपये करावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी दिली आहे. "राज्यात ९ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. गोपीनाथ मुंडे महामंडळला केंद्र सरकारने मदत करावी, ऊसतोडणी मजूर नावनोंदणी करावी, जे कारखाने एकरकमी एफआरपी देणार नाहीत ते कारखाने चालू देणार नाही", असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला.