आशिया चषक २०२२ मधील भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. सुपर ४ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघाबरोबरचे सामने भारताने गमावले. दरम्यान, सुपर ४ च्या समान्यांपूर्वीच भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गंभीर दुखपतींमुळे स्पर्धेबाहेर पडला. यासंदर्भात बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली होती. यानंतर त्याच्या जागी अक्षर पटेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले.

आशिया चषकात रवींद्र जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन षटकांत ११ धावा दिल्या ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. त्याने हार्दिक पांड्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला संकटातून सावरत विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवले होते. या सामन्यात त्याने क्षेत्ररक्षण करतानाही महत्त्वाची भूमिका बजावली. हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही जडेजाने चार षटकात केवळ १५ धावा देत एक विकेट घेतली होती.

गेल्या दोन समान्यांमधील पराभवानंतर प्रत्येक क्रिकेटप्रेमीला भारतीय संघातील जडेजाची कमतरता जाणवते आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, आता त्याचे यशस्वी ऑपरेशन झाले आहे. जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. लवकरात लवकर मैदानात परतण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

कोण म्हणतं भारत अर्शदीपमुळे हरला? टीम इंडियाच्या पराभवाची ‘ही’ आहेत कारणं

जडेजाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. अनेकजणांनी मला सहकार्य केले, त्यांचे मी आभार मानतो. यामध्ये बीसीसीआय, माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, डॉक्टर आणि चाहते यांचा समावेश आहे. मी लवकरच माझा सराव पुन्हा सुरू करेन आणि लवकरात लवकर क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.’ दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर जडेजा २०२२ला होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकेल याच्या शक्यता फारच कमी आहेत. जर हे एसएएल प्रकरण असल्यास त्याला पूर्णपणे बरे होण्यास सह महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याचीही शक्यता आहे.

तथापि, प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मते, जडेजाला आतापासूनच टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर समजणे उचित ठरणार नाही. या सामान्यांना अजून बराच कालावधी आहे. म्हणून जडेजाला या स्पर्धेतून बाहेर काढू शकत नाही. तो तज्ञांच्या देखरेखीखाली असून त्याच्या तब्येतीबाबत ठोस माहिती मिळत नाही, तोपर्यंत याबद्दल कोणतेही भाष्य करणे योग्य नाही.

जडेजा बऱ्याच काळापासून गुडघ्याच्या समस्येशा समना करत आहे. आयपीएल २०२२ दरम्यान रवींद्र जडेजाला ही दुखापत झाली होती. यामुळेच त्याला काही सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर जडेजाने इंग्लंड दौऱ्यातून मैदानात पुनरागमन केले. तेव्हापासून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याचे संघाबाहेर होणे टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे.