भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर अतिक्रिकेटमुळे येणारा भार कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माला टी-२० संघाचं कर्णधारपद देता येईल, रोहितने आयपीएलमध्ये ३ वेळा मुंबई इंडियन्स संघाला विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्यामुळे रोहितच्या नावाचा विचार करण्यास काहीच हरकत नसल्याचं युवराज सिंहने म्हटलं आहे.

अवश्य वाचा –  टीम इंडियात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी सुरेश रैनाही शर्यतीमध्ये

“काही वर्षांपूर्वी वन-डे आणि कसोटी असे दोनच प्रकार खेळवले जायचे. त्यामुळे दोन्ही संघासाठी एकच कर्णधार योग्य असायचा. मात्र आता टी-२० क्रिकेटमुळे विराट कोहलीवर जर अतिक्रिकेटमुळे भार येणार असेल, तर टी-२० क्रिकेटसाठी दुसऱ्या खेळाडूचा विचार करता येऊ शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये रोहित एक यशस्वी कर्णधार आहे.” ‘आज तक’ वाहिनीशी बोलत असताना युवराज सिंह बोलत होता.

एक खेळाडू म्हणून विराट कोहली स्वतःवर किती ताण घेऊ शकतो, याचा विचार संघ व्यवस्थापनाने केला आहे की नाही मला माहिती नाही. त्यांना टी-२० क्रिकेटमध्ये नेतृत्वासाठी दुसरा खेळाडू हवा आहे का?? हा संपूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. विराट एक सर्वोत्तम फलंदाज आहे, त्यामुळे त्याचा भार कसा कमी करायचा हा संपूर्णपणे संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. युवराज सिंहने आपलं मत मांडलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली होती, यानंतर २ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.