विराट कोहलीने भारताच्या टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हापासून रोहित शर्मा वनडेमध्येही कर्णधार होणार की नाही, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे निर्णयाची वेळ आली असल्याचे मानले जात आहे. विराटने टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर भारत प्रथमच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिका खेळली गेली. रोहितच्या नेतृत्वात भारताने टी-२० मालिका ३-० अशी जिंकली. आता माध्यमांच्या वृत्तानुसार, रोहितला अजून एक मोठे पद मिळणार आहे.

मुंबई कसोटीत न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार विजयाने कसोटी मालिका संपुष्टात आली. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. कानपूर येथे होणारी निवड बैठक कोविड-१९ च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे पुढे ढकलण्यात आली. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला ५ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने भारतीय संघ कधीही निवडला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे.

भारतीय संघ आधी ८ डिसेंबर रोजी रवाना होणार होता, परंतु ओमिक्रॉन रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता हा दौरा आठवडाभराने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “विराटला सध्या वनडे कर्णधारपद राखणे कठीण आहे. यावर्षी फार कमी सामने आहेत त्यामुळे वनडेला फारसे महत्त्व नाही. अशा स्थितीत याबाबत निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो.”

हेही वाचा – VIDEO : ले पंगा..! प्रो कबड्डी लीगच्या नव्या हंगामाचा प्रोमो रिलीज; नव्या अवतारात दिसला महेंद्रसिंह धोनी!

मात्र, याविरुद्धचा युक्तिवाद असा आहे की, एकाच दोन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील तर मतभेद निर्माण होतील. अशा परिस्थितीत रोहितला ही जबाबदारी सोपवण्यात यावी, असे या निर्णयाशी संबंधित बहुतांश लोकांना वाटते, जेणेकरून त्याला २०२३ पूर्वी संघाची तयारी करण्यासाठी आवश्यक वेळ मिळू शकेल. या आठवड्यात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह मोठे निर्णय घेऊ शकतात, ज्याचा भारतीय क्रिकेटवर दीर्घकाळ परिणाम होईल.”

भारताला दक्षिण आफ्रिकेत तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत आणि आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, की देशाला व्हाईट-बॉल (मर्यादित षटकांच्या) फॉरमॅटमध्ये दोन कर्णधारांची गरज आहे का, ज्यामुळे संघात संघर्ष होऊ शकतो. रोहित शर्मा आधीच टी-२० संघाचा कर्णधार आहे आणि २०२३ मध्ये होणार्‍या ५० षटकांच्या विश्वचषकासह, बीसीसीआय मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार ठेवणार असल्याची चर्चा आहे.