आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी काही दिवसांचाच अवधी उरला असताना भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नवा भारतीय संघ जाहीर केला. यात मुंबईकर अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरला १५ सदस्यीय भारतीय संघात जागा मिळाली आहे. शार्दुलने अक्षर पटेलची जागा घेतली आहे. मागील काही काळापासून शार्दुलने गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही आपली कमाल दाखवली आहे. इंग्लंड दौरा आणि त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर शार्दुलने निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले.

संघातील हा बदल हार्दिक पंड्याच्या फिटनेसच्या दृष्टीने घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आयपीएल २०२१ मध्येही त्याने गोलंदाजी केली नाही. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजीबरोबरच आक्रमक फलंदाजी करणाऱ्या शार्दुलला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्यांदा वर्ल्डकप संघ जाहीर झाला, तेव्हा शार्दुल स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता. आता अक्षरने त्याची जागा घेतली आहे. आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि के. गौथम हे खेळाडू दुबईत संघाच्या बायो बबलमध्ये सामील होतील आणि टीम इंडियाला त्यांच्या तयारीमध्ये मदत करतील.

आरसीबीकडून खेळणाऱ्या हर्षल पटेलने १५ सामन्यांमध्ये ३२ विकेट्स घेतल्या. तर सनरायझर्स हैदराबादच्या उमरान मलिकने आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध १५२.९५ प्रति तास वेगाने चेंडू टाकला. जो या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू ठरला.

हेही वाचा – विराटनंतर RCBला मिळणार इंग्लिश कर्णधार?; मायकेल वॉन म्हणतो, “तो धोनीसारखा…”

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टँड-बाय खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल</p>