महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा का दिल्यानंतर आता त्याचे कारण काय असावे, याबाबत विविध तर्कवितर्क करण्यात येत आहेत. मात्र भारतीय संघातील गेल्या काही आठवडय़ांतील वातावरण पाहता ही धोनीची अखेरची मालिका असल्याचे संकेत मिळत होते, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
गेले काही आठवडे भारतीय ड्रेसिंग रूममधील समीकरण नाटय़मयरीत्या बदलले होते. अ‍ॅडलेड कसोटीत नेतृत्व करणारा विराट कोहली आणि संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्यातील वाढती जवळीक हे या मागील मूळ कारण असल्याचे समोर येत आहे. प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा धोनीवर अतिशय चांगला प्रभाव होता. परंतु शास्त्री यांनी संचालकपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून फ्लेचर यांच्या अधिकारांवर गदा आल्या. याचप्रमाणे शास्त्री यांनी संघातील महत्त्वाच्या निर्णयांसहित सर्वच गोष्टींमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
धोनीची नेतृत्व करण्याची पद्धती वेगळी होती. त्याने फ्लेचरसहित संघातील अन्य सहकाऱ्यांसोबत सांघिक वातावरण निर्माण केले होते. याचप्रमाणे आपल्या स्वाभाविक वृत्तीनुसार तो भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळायचा. परंतु गेले काही दिवस शास्त्रीमुळे धोनीच्या नेतृत्वप्रक्रियेत अडचणी येत होत्या.
या मालिकेत भारतीय संघ आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळत आहे. मैदानावरील आक्रमकता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पाहायला मिळाली. ‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या सिद्धांतांच्या हे विरोधात होते. धोनी वाक्युद्धाऐवजी शांतपणे प्रश्न सोडवणे पसंत करायचा.
अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात धावांचा पाठलाग करताना कोहलीने आपल्या नेतृत्वाची आणि आक्रमकतेची झलक दाखवली. कोहलीच्या याच दृष्टीकोनामुळे शास्त्रीचा त्याच्यावर विश्वास वृद्धिंगत झाला.