पीटीआय, अहमदाबाद भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरची पाठ पुन्हा दुखावली असून त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करता आली नाही. तसेच खेळाडूंना सतत होणाऱ्या दुखापतींमुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीवरही (एनसीए) प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. श्रेयसला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनही माघार घ्यावी लागू शकेल. श्रेयसला पाठीच्या दुखापतीमुळेच नागपूर येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. मात्र, चौथ्या कसोटीत त्याची पाठ पुन्हा दुखावली.‘‘तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर श्रेयस अय्यरने पाठदुखीची तक्रार केली होती. त्याला तपासणीसाठी नेण्यात आले असून ‘बीसीसीआय’चे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे,’’ असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले. मात्र, श्रेयसच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्यामुळे ‘एनसीए’च्या व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही ‘एनसीए’कडून त्यांना खेळण्याची परवानगी मिळते का? तसेच भारतीय संघ व्यवस्थापन दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूबाबत योग्य ती खबरदारी घेते का? असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नियमात बदल का?‘‘ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जवळपास १७० षटके क्षेत्ररक्षण केल्याने श्रेयसच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, श्रेयस पाठीच्या दुखापतीमुळेच पहिल्या कसोटीला मुकला होता. त्यानंतर ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार, भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी त्याने किमान एक प्रथमश्रेणी सामना खेळणे गरजेचे होते. मात्र, श्रेयससाठी हा नियम बदलण्यात आला. त्याला थेट संघात स्थान देण्यात आले. असे का घडले ? त्याला इराणी चषकाचा सामना खेळण्याची सूचना केली पाहिजे होती,’’ असे अखिल भारतीय निवड समितीचा माजी सदस्य म्हणाला.