मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत शानदार शतक झळकावले आहे. अय्यरने कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा अय्यर हा १६वा भारतीय फलंदाज आहे. इतकेच नव्हे, तर कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा तो सलग तिसरा मुंबईकर ठरला. यापूर्वी रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली आहे.

भारताचा नवा टी-२० कप्तान रोहित शर्माने २०१३मध्ये कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात कसोटी शतक ठोकले. यावेळी त्याने १७७ धावांची खेळी केली. त्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटमध्ये १३४ धावांची खेळी केली. आता श्रेयसने आपला क्रमांक फलकावर लावला आहे.

हेही वाचा – Sexting Scandal नंतर टिम पेनचा ‘मोठा’ निर्णय; आधी ऑस्ट्रेलियाचं कप्तानपद सोडलं आणि आता…

न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय ठरला आहे. याशिवाय कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. गुंडप्पा विश्वनाथ यांनी त्यांच्या आधी १९६९ साली हा पराक्रम केला होता.

अय्यरने २०१७ मध्ये भारतीय संघासाठी टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चार वर्षांनंतर त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. अय्यर हा कसोटी खेळणारा ३०३वा भारतीय क्रिकेटपटू आहे.