Shubman Gill Statement on India Defeat: भारतीय संघाला इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात २७ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंग्लंडने या सामन्यात ३८७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. भारताने प्रत्युत्तरात रोहित शर्माच्या विक्रमी शतकी खेळीच्या बळावर कडवी झुंज दिली, पण संघाला विजय मिळवता आला नाही. भारताने नेमका सामना कुठे गमावला हे कर्णधार शुबमन गिलने सांगितलं.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जेकब बेथेल व बेन डकेट यांनी १९२ धावांची विक्रमी भागीदारी रचत हा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. त्यानंतर बेथेल ९१ धावा, डकेट १४१ धावा, जो रूट ७४ धावा व जोस बटलर ४१ धावांचं योगदान देत संघाला ३८७ धावांपर्यंत नेलं. तर प्रत्युत्तरात शुबमन गिल व रोहित शर्मा यांनी १४६ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ११० चेंडूत १७ चौकार व ५ षटकारांसह १३८ धावांची खेळी केली. तर गिलने ७७ धावा, विराट कोहली ७४ धावा केल्या. याशिवाय इतर सर्व फलंदाज धावा कऱण्यात अपयशी ठरले. याशिवाय भारताचे गोलंदाज अपयशी ठरल्याने भारताला पराभवाचा मोठा फटका बसला.
शुबमन गिल भारताच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
भारताच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “माझ्या मते, आम्ही ४५व्या षटकापर्यंत सामन्यात होतो. मात्र, शेवटच्या तीन षटकांत आम्ही खूप धावा दिल्या. जवळपास ६० धावा गेल्या आणि तिथेच सामना आमच्या हातातून निसटला.”
धावांचा पाठलाग करताना संघाचा विचार काय होता? यावर गिलने सांगितलं, “आमचा विचार असा होता की, ४० षटकांनंतर आमच्याकडे पुरेसे गडी शिल्लक असतील तर आम्ही सामन्यात राहू. पण त्याचवेळी आम्हाला सामन्यात फार मागेही पडायचं नव्हतं. त्यामुळे पॉवरप्लेनंतर आम्ही धावगती ६ ते ६.५ च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला. जर तीच गती कायम ठेवली असती आणि अखेरच्या १० षटकांत १००-११० धावा केल्या असत्या, तर सामना कुठल्याही बाजूला झुकू शकला असता.”
या मालिकेतून भारताला कोणते सकारात्मक मुद्दे मिळाले?
“या मालिकेत जवळपास प्रत्येक फलंदाजाने धावा केल्या. मात्र, या सामन्यात आमची गोलंदाजी, विशेषतः पॉवरप्लेमध्ये, अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आम्ही खूप ऑफ-स्टंपबाहेरील चेंडू टाकले आणि इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी त्याचा उत्कृष्ट फायदा घेतला. पॉवरप्लेनंतर त्यांनी आम्हाला पुनरागमनाची संधीच दिली नाही. त्यातच अखेरच्या षटकांत त्यांनी आणखी वेगाने धावा करत आमच्या आवाक्याबाहेर मजल मारली. तरीही मालिकेत अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. जवळपास प्रत्येक खेळाडूने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये योगदान दिलं,” असं गिलने म्हटलं.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या योगदानाबद्दल गिल म्हणाला, “दोघांनीही अनेक वर्षे जगभरात भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. विशेषतः आज रोहित भाईने खेळलेली १४० धावांची खेळी पाहून खूप आनंद झाला. अखेरीस खेळपट्टी थोडी संथ झाली होती, त्यामुळे मोठे फटके मारणं सोपं नव्हतं. अशा परिस्थितीत रोहितने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती पाहणं म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच होती.”
