हिसार येथे होत असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतून सहा वेळा विश्वविजेती बॉक्सिंग मेरी कोमने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता तिचे यापाठचे कारण समोर आले आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मेरीने माघार घेण्याचे कारण उलगडले आहे. युवा आणि आगामी बॉक्सर्सना स्वतःचे नाव कमावण्याची संधी देण्यासाठी माघार घेतली, असे मेरीने सांगितले.

मेरी म्हणाली, “मी राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेण्याची ही पहिली वेळ नाही. मला आगामी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची आणि राष्ट्रीय मंचावर स्वतःचे नाव उंचावण्याची संधी द्यायची आहे. जर मी खेळत राहिली, तर कदाचित त्यांना राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळणार नाही.”

हेही वाचा – ENG vs IND : ‘‘रद्द झालेला तो सामना आता…”; BCCI आणि ECBचं ‘त्या’ महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब!

मेरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तिच्या सहभागाच्या प्रश्नाचेही उत्तर दिले. “मला खूप उशिरा सूचना मिळाली. काही दिवसांपूर्वी भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने (बीएफआय) जाहीर केले, की जो कोणी राष्ट्रीय विजेता असेल तो जागतिक स्पर्धेत जाईल. जर मला थोडी आधी माहिती मिळाली असती किंवा त्यांनी आम्हाला ऑलिम्पिकनंतर नोटीस दिली असती, ते अधिक चांगले झाले असते.”

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (बीएफआय) जाहीर केले आहे, की केवळ राष्ट्रीय अजिंक्यपद सुवर्णपदक विजेत्यांनाच जागतिक अजिंक्यपद संघात स्थान मिळेल. राष्ट्रीय चॅम्पियनशिप २१ ऑक्टोबरपासून हिसार येथे सुरू झाली आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेन (६९ किलो) हिला टोक्यो ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या आधारे जागतिक अजिंक्यपद संघात थेट स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ती राष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी होणार नाही.