INDW vs IREW Updates: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आज भारत विरुद्ध आयर्लंड संघातील सामना खेळला जात आहे. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या. त्याचबरोबर आयर्लंड संघासमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक धावा केल्या. मंधानाने ५६ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ८७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. त्याचबरोबर तिने शफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी केली.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात शानदार झाली. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्माने पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर भारतीय संघाला ९.३ षटकात पहिला धक्का बसला. शफाली वर्मा २९ चेंडूचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने २४ धावा करुन बाद झाली.
भारतीय संघाला एकाच षटकांत दोन धक्के –
पहिल्या भागीदारीनंतर भारतीय संघाची धावसंख्या मजबूत होती.परंतु कर्णधार लॉरा डेलेनी आयर्लंड संघासाठी १६ वे षटक घेऊन आली होती. तिने आपल्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर भारतीय संघाला मोठा धक्का देत दोन फलंदाज केले. ज्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि रिचा घोषच्या विकेट्सचा समावेश होता. हरमनप्रीत सिंगने १३ धावांचे योगदाने दिले, तर रिचा घोषला भोपळाही फोडता आला नाही.
हेही वाचा – Prithvi Shaw’s selfie controversy: पृथ्वी शॉवर हल्ला करणाऱ्या सपना गिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आयर्लंड संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार लॉरा डेलेनीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर ओर्ला प्रेंडरगैस्टने दोन आणि आर्लेन केलीने एक विकेट घेतली. त्यांना आता विजयासाठी १५६ धावा करण्याची गरज आहे.
विजयासह उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल –
जर भारतीय संघाने आजचा सामना जिंकला, तर तो ४ गुणांसह गट-२ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. कारण टीम इंडियाने पहिल्या तीन सामन्यांपैकी २ जिंकले आहेत आणि एकात पराभव झाला आहे. मात्र भारतीय संघाने हा सामना जिंकला तर त्याचे स्थान आणखी मजबूत होईल. सध्या ग्रुप-२ मध्ये इंग्लंड ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचे सर्व सामने संपले आहेत. पाकिस्तान संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात जरी इंग्लंडला पराभूत केले, तरी त्यांचे केवळ चार गुण होऊ शकतील.