दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आशावादी जोहान्सबर्ग : ‘ओमायक्रॉन’ या करोना विषाणूच्या नव्या उत्परिवर्तनामुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा आशावाद आफ्रिकेचे अनुक्रमे कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व करणारे डीन एल्गर आणि तेम्बा बव्हुमा यांनी व्यक्त केला आहे. आफ्रिका क्रिकेट मंडळ जैव-सुरक्षित परिघाची उभारणी करून दोन्ही संघांतील खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेईल, असेही मत दोन्ही कर्णधारांनी मांडले. भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. उभय संघांतील पहिल्या कसोटीला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अनुक्रमे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात येईल. ‘बीसीसीआय’ने या दौऱ्याला हिरवा कंदील दिला आहे.