ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग हा अमली पदार्थ सेवनाबाबत आणखी संकटात सापडला जाणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीस (नाडा) त्याची उत्तेजक चाचणी घेण्यास सांगितले आहे. विजेंदर याने डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत बारा वेळा हेरॉईन घेतले असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. विजेंदर याच्यावर अमली पदार्थाच्या व्यापारात अडकला असल्याचा आरोप ठेवल्यानंतर एक महिन्याने क्रीडा मंत्रालयास जाग आली आहे. मंत्रालयाने नाडाचे सरसंचालक मुकुल चटर्जी यांना पत्र लिहून विजेंदरची वैद्यकीय चाचणी घेण्याचे कळविले आहे. विजेंदर हा अशा बेकायदेशीर व्यापारात अडकला असल्याचे पाहून मंत्रालयास अतिशय खेद वाटत आहे. विजेंदर हा उदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श खेळाडू मानला जातो. त्यामुळेच त्याच्यावरील आरोपांची शहानिशा करण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊनच त्याची उत्तेजक चाचणी घेण्याची आवश्यकता आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.