श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना आज कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळला जात आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादव आणि शिखर धवन यांच्या योगदानामुळे टीम इंडियाने २० षटकात लंकेसमोर ५ बाद १६४ धावा केल्या.  वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनसमोर आता टी-२० मालिकाविजयाचे ध्येय आहे. दुसरीकडे दासुन शनाकाच्या नेतृत्वातील दासुन शनाकाला मागील पराभव विसरून नव्याने सुरुवात करावी लागेल. वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल, हे नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा डाव

पदार्पणाची संधी मिळालेला पृथ्वी शॉ आणि कर्णधार शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. मात्र पहिलाच चेंडू  घातक ठरला. लंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीराने पृथ्वीला यष्टीपाठी झेलबाद केले. पृथ्वी बाद झाल्यावर संजू सॅमसन मैदानात आला. त्याने धवनसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. टीम इंडियाचे अर्धशतक झाल्यानंतर वनिदू हसरंगाने सॅमसनला पायचित पकडले. सॅमसनने २७ धावांची खेळी केली. सॅमसनची जागा सूर्यकुमार यादवने घेतली. धवन-सूर्यकुमारने टीम इंडियाचे शतक फलकावर लावले. या दोघांनी ३६ चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १४व्या षटकात भारताचा कर्णधार झेलबाद झाला. धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमारने अफलातून अर्धशतक ठोकले. १६व्या षटकात सूर्यकुमार हसरंगाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली.

सूर्यकुमारनंतर आलेला हार्दिक पंड्या पुन्हा एकदा अपयशी ठरला. पंड्याने १२ चेंडूत १० धावा केल्या. शेवटच्या षटकांत इशान किशनने फटकेबाजी केल्यामुळे भारताला दीडशेचा पल्ला गाठता आला. इशानने २० धावा केल्या. लंकेकडून हसरंगा आणि चमीरा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka vs india 2021 first t20 first inning report adn
First published on: 25-07-2021 at 21:42 IST