दोन्ही विभागांत जेतेपदासाठी पुण्याशी गाठ

पालखी मैदान, सोलापूर येथे सुरू असलेल्या ५७व्या राज्य र्अंजक्यपद खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगर आणि महिलांमध्ये ठाण्याच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली. दोन्ही विभागांत जेतेपदाच्या लढतीत त्यांची पुण्याशी गाठ पडणार आहे.

पुरुष गटाच्या उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीवर २२-१८ अशी सरशी साधली. र्मिंलद कुरूपे (१.२० मिनिटे आणि ८ गडी), सागर लेंग्रे (१.३० मि., ४ गडी) यांनी पुण्यासाठी अष्टपैलू चमक दाखवली. सांगलीकडून अरुण गुणकी (१.४० मि., ५ गडी), वसुराज लांडे (३ गडी) यांनी कडवी झुंज दिली.

दुसऱ्या उपांत्य लढतीत गतविजेत्या मुंबई उपनगरने ठाण्याला १९-१८ असे अवघ्या एका गुणाच्या फरकाने नमवले. निहार दुवळे (६ गडी), ओंकार सोनावणे (१.५० मि.) आणि अक्षय भांगरे (१.२० मि.) यांनी उपनगरच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ठाण्याकडून गजानन शेंगाळने (१.२० मि., २ गडी) उत्तम खेळ केला.

महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या पुण्याने उस्मानाबादला १५-१३ असे पराभूत केले. प्रियंका इंगळे (२.३० मि., ५ गडी), ऋतिका राठोड (१.२० मि., ४ गडी) या दोघी पुण्याच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. उस्मानाबादसाठी किरण शिंदे (२.१० मि.), जान्हवी पेठे (१.४० मि.) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

महिलांच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत ठाण्यने रत्नागिरीवर १४-११ अशी मात केली. ठाण्याच्या रेश्मा राठोडने आक्रमणात तब्बल सात गडी बाद करतानाच ३ मिनिटे संरक्षण करून या सामन्यात छाप पाडली. रुपाली बडे (२ मि.) आणि गीतांजली नरसाळ (१ मि.) यांनी तिला उत्तम साथ दिली. रत्नागिरीकडून अपेक्षा सुतारने (२ मि., ३ गडी) एकाकी झुंज दिली.