मुंबई : श्री मावळी मंडळातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात वाशिंदच्या जय बजरंग क्रीडा मंडळाला आणि महिला गटात मुंबई शहरच्या शिवशक्ती महिला संघाने जेतेपद पटकावले. पुरुषांमध्ये बजरंग मंडळाने स्वस्तिक क्रीडा मंडळाविरुद्धच्या अंतिम सामन्यात जालिंदर सानप, राजू कथारे यांच्या उत्कृष्ट चढाया आणि योगेश लोणेने पकडीत दिलेल्या योगदानामुळे सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत मध्यंतराला १६-९ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही सामन्यावरील नियंत्रण न गमावता बजरंग मंडळाने सामना ३२-१७ असा जिंकला. पराभूत संघाकडून आदिनाथ गायकवाडने एकाकी झुंज दिली. महिलांमध्ये मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने धुळय़ाच्या शिवशक्ती स्पोर्ट्स संघाचा ३५-२४ असा पराभव केला. शिवशक्ती संघाकडून अपेक्षा टाकळे, रक्षा नारकर यांनी दिमाखदार खेळ केला. बजरंग संघाचा राजू कथोरे आणि शिवशक्ती संघाची ऋतुजा बांदिवडेकर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.