संदीप कदम

१९९७च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताने भूषवले होते. या विश्वचषकासाठीच्या संभाव्य संघातील १४ वर्षीय मिताली राजने सर्वाचे लक्ष वेधले होते. स्पर्धेसाठीच्या अंतिम संघात त्यावेळी तिची निवड झाली नाही. परंतु ‘लेडी तेंडुलकर’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या या मुलीने त्यानंतरच्या काळात भारतीय महिला क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला.

कोणत्याही खेळाडूला शिस्तीशिवाय मोठी कारकीर्द घडवता येत नाही. मात्र, आळस घालवण्यासाठी मितालीला तिचे वडील दोराई राज यांनी क्रिकेट सरावाला पाठवले. अनेक वेळा तिला खेळायला मिळायचे नाही, तेव्हा ती सीमारेषेजवळ प्रतीक्षा करायची. मग प्रशिक्षक ज्योती प्रसाद यांनी मितालीमधील कौशल्य पाहून संपत कुमार यांच्याकडे सरावाला धाडले. एकीकडे शास्त्रीय नृत्याची आवड असतानाही मितालीने पालकांनी निवडलेल्या खेळात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर कठोर मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने एक तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असणारी फलंदाज भारताला मिळाली. याच मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढल्या. तिने आपल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून विक्रमी १०,८६८ धावा केल्या आणि एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दोन अंतिम सामन्यांत भारताचे नेतृत्व करणारी ती पहिली कर्णधार ठरली. आपल्या दिमाखदार फलंदाजीने तिने अनेक गोलंदाजांना झगडायला लावले.

आंध्र प्रदेश संघात वयाच्या १३व्या वर्षी मितालीची निवड झाली. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तिला फार काळ प्रतीक्षा करावी लागली नाही. वयाच्या १७व्या वर्षीच १९९९मध्ये तिने आर्यलडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच लढतीत तिने ११४ धावांची शतकी खेळी रचत सर्वाचे लक्ष वेधले. यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीचा धावांचा प्रवाह अखंडित सुरू होता. तिने आजवर २३२ एकदिवसीय सामन्यांत ७,८०५ धावा केल्या आहेत. यासह महिला क्रिकेटमध्ये सलग सात अर्धशतकांचा विक्रमसुद्धा तिच्या नावावर आहे. २००५मध्ये मितालीकडे भारताचे कर्णधारपद आले. याचवर्षी भारताने विश्वचषक क्रिकेटची अंतिम फेरीही गाठली.

मितालीने आपल्या कारकीर्दीत अवघे १२ कसोटी सामने खेळले आहेत. २००२मध्ये १९व्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत तिने २१४ धावांची द्विशतकी खेळी करत आपले नाणे खणखणीत वाजवले. या कसोटीनंतर आगामी चार वर्षांत मिताली फक्त पाच कसोटी सामने खेळली. त्यानंतर आठ वर्षे ती एकही कसोटी सामना खेळली नाही. पण मिताली आपल्या कामगिरीने भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बनली. सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडू तिच्याकडून प्रेरणा घेऊन क्रिकेट खेळायला लागल्या. मितालीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७च्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, मात्र पुन्हा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मितालीला संपूर्ण कारकीर्दीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. यात प्रशिक्षक रमेश पोवारशी मतभेदांमुळे महिला क्रिकेटमध्ये वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे पोवारला आपले प्रशिक्षकपदही गमवावे लगाले. मिताली आणि हरमनप्रीत कौर यांच्यातही वाद निर्माण झाल्याचे चर्चेत होते. मात्र वादातून सावरल्यावर २०१९मध्ये मितालीने ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती घेतली.

भारतीय महिला क्रिकेटची विभागणी दोन पर्वात करावी लागेल. एक म्हणजे मिताली येण्यापूर्वी आणि मिताली आल्यानंतर. मितालीचे क्रिकेट पदार्पण होण्यापूर्वी महिला क्रिकेटला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. मितालीचे आगमन झाल्यानंतरही परिस्थिती फारशी सकारात्मक नव्हती. एकीकडे पुरुष क्रिकेटमध्ये खेळाडूंना सोयीसुविधा, पैसा आणि लौकिक मिळत होता. महिला क्रिकेटमध्ये सुविधा आणि चांगल्या प्रशिक्षकांचा अभाव होता. महिलांसाठी देशांतर्गत क्रिकेटचा पायाही मजबूत नव्हता. मितालीच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी सर्व परिस्थितीचा सामना केला. मितालीच्या क्रिकेटमधील दोन तपाचे फळ आज आपल्याला दिसत आहे. गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटपटूंसाठीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रेणीनिहाय कराररचना लागू केली आहे. पुढील वर्षी महिला ‘आयपीएल’चेही आयोजन होणार आहे. महिला क्रिकेटच्या या प्रगतीच्या वाटचालीत मितालीचे स्थान ठळकपणे अधोरेखित होते.

sandip.kadam@expressindia.com