जिंकण्यासाठी ते काहीपण करण्याची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने रविवारी हे सिद्ध केले आहे. ताप असतानाही तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक टी-२० सामन्यात उतरला आणि तो सामनावीर ठरला. ३२ वर्षीय सूर्यकुमार यादवने १९१.६६ च्या स्ट्राइक रेटने ३६ चेंडूत ६९ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे १८७ धावांचे लक्ष्य चार गडी गमावून पूर्ण केले. विजयानंतर सूर्यकुमारने अक्षर पटेल यांच्याशी चर्चा करताना आपल्या आजाराविषयी सांगितले.

या संभाषणाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. यामध्ये सूर्यकुमारने सांगितले की या सामन्यापूर्वी त्याची तब्येत खराब होती आणि त्याला नीट झोपही येत नव्हती. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी मध्यरात्री ३.०० वाजता सूर्यकुमार यादव आजारी पडला होता. त्याला पोटदुखी आणि ताप आला होता. त्याची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली. पण सुदैवाने त्यात काही आढळले नाही.

हेही वाचा :   India T-20 Wins in 2022: ऑस्ट्रेलियाचा पराभव आणि पाकिस्तानला दणका; टीम इंडियाने मोडला ‘हा’ विक्रम

अक्षरने विचारले कि त्याचे काय झाले की, तर सूर्यकुमार यादव म्हणाला “थोडे पोट दुखत होते, त्यानंतर तापही आला होता, पण मला हे देखील माहित होते की हा सामना निर्णायक आहे, म्हणून मी माझ्या डॉक्टर आणि फिजिओला सांगितले की मी अशा आजाराने बसू शकत नाही. जर हा विश्वचषकाचा अंतिम सामना असेल तर मी काय करणार. अशा वेळी देश महत्त्वाचा असतो. म्हणून तुम्ही काहीही करा… अगदी काहीही करा, कोणतीही गोळी द्या, अथवा इंजेक्शन द्या, पण मला संध्याकाळच्या खेळासाठी तयार करा. एकदा तुम्ही मैदानावर आलात, जर्सी घातली, मग तुमच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते.”

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली दोघांमध्ये ६२ चेंडूत १०४ धावांची भागीदारी झाली. शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती. कोहलीने पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. यानंतर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याने भारताला विजय मिळवून दिला.