भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज बुधवारी टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. रोम येथे झालेल्या सेट्टे कोली करंडक जलतरण स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात नटराजने नोंदवलेली ‘अ’ दर्जाची पात्रता वेळ आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने (फिना) मान्य केली आहे. ‘‘नटराजने नोंदवलेली ५३.७७ सेकंदांची वेळ ‘फिना’कडून मान्य करण्यात आली आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) नटराजच्या ऑलिम्पिकमधील सहभागाची मागणी ‘फिना’कडे केली होती. आता श्रीहरी आणि साजन प्रकाश हे भारताचे दोन जलतरणपटू टोक्योसाठी रवाना होतील,’’ असे ‘एसएफआय’कडून सांगण्यात आले. ऑलिम्पिक पात्रतेच्या अखेरच्या दिवशी संयोजकांनी बेंगळूरुस्थित नटराजलाही या चाचणीस सहभागी होण्याची संधी दिली होती. आता पहिल्यांदाच भारताचे दोन जलतरणपटू ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करतील.