गुवाहाटी : कर्णधार अजिंक्य रहाणेने (५५ चेंडूंत ६९ धावा) चार सामन्यांतील तिसरे अर्धशतक साकारूनही मुंबईला सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगडविरुद्ध अवघ्या एका धावेने निसटता पराभव पत्करावा लागला.

गुवाहाटी येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीतील पराभवामुळे मुंबईची ‘ब’ गटात तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबईच्या खात्यात चार सामन्यांतील दोन विजयांचे आठ गुण असून कर्नाटक (१६) आणि बंगाल (१२) या गटात अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. मंगळवारी मुंबईसमोर बडोद्याचे आव्हान असेल.

प्रथम फलंदाजी करताना शशांक सिंग (५७) आणि अखिल हेरवाडकर (५३) यांच्या अर्धशतकांमुळे छत्तीगसडने ५ बाद १५७ धावा केल्या. ३ बाद ५० धावांवरून शशांक आणि अखिल यांनी चौथ्या गडय़ासाठी ८० धावांची भागीदारी रचली. मुंबईसाठी तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिद्धेश लाड यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना रहाणेने आणखी एक शानदार खेळी साकारली. पृथ्वी शॉ (०), यशस्वी जैस्वाल (४) पाच षटकांतच माघारी परतल्यावर रहाणेने सिद्धेशसह (४६) तिसऱ्या गडय़ासाठी ७५ धावांची भर घातली. सिद्धेश बाद झाल्यावर शिवम दुबेनेसुद्धा (२२) बहुमूल्य योगदान दिले. ही जोडी सहज मुंबईला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. मात्र दुबे १७व्या षटकात बाद झाला. तर अखेरच्या षटकात सौरभ मजुमदारने रहाणेला बाद करत ८ धावांचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे मुंबईला विजयी हॅट्ट्रिक साकारण्यात अपयश आले.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड : २० षटकांत ५ बाद १५७ (शशांक सिंग ५७, अखिल हेरवाडकर ५३; तुषार देशपांडे १/२०) विजयी वि. मुंबई : २० षटकांत ५ बाद १५६ (अजिंक्य रहाणे ६९, सिद्धेश लाड ४६; सुमित रुईकर २/२४)

’ गुण : छत्तीसगड ४, मुंबई ०