अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगेलल्या टी-२० वर्ल्डकपच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात केली आहे. या विजयासह भारताने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवत चाहत्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाला आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी जर-तर या समीकरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. पण जुन्या कामगिरीच्या कटू आठवणी बाजूला ठेवत विराटसेनेने आज अफगाणिस्तानची धुलाई केली. अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची अर्धशतके, तर हार्दिक पंड्या-ऋषभ पंत यांनी काढलेल्या झटपट धावांमुळे भारताने अफगाणिस्तानसमोर २११ धावांचे आव्हान ठेवले. रोहित-राहुलने सलामीला येत १४० धावांची भागीदारी रचली. तर पंड्या-पंत यांनी शेवटच्या २१ चेंडूत तब्बल ६३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्फोटक फटकेबाजी केली, पण भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. २० षटकात अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावांपर्यंतच पोहोचता आले. रोहित सामनावीर ठरला. या विजयासह भारताने आपल्या गुणांचे खाते उघडले.मोठ्या फरकाने हरवल्याने भारताची धावगती धन (+०.०७३) झाली आहे. अफगाणिस्तानचा डाव भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. त्याने शहजादला झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शहजादनंतर जसप्रीत बुमराहने आक्रमक झाझाईलाही (१३) माघारी पाठवले. या दोघांनंतर गुलबदिन नैब आणि रहमतुल्लाह गुरबाझ यांनी फटकेबाजी केली. पॉवरप्लेमध्ये अफगाणिस्तानने २ बाद ४७ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला. फिरकीपटू रवींद्र जडेजाने रहमतुल्लाहला तंबूत पाठवले. सीमारेषेवर हार्दिकने त्याचा अवघड झेल घेतला. रहमतुल्लाहने १९ धावा केल्या. रहमतुल्लाहनंतर नजीबउल्लाह झादरान फलंदाजीला आला. चार वर्षानंतर टीम इंडियाच्या टी-२० संघात खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने भारताला चौथे यश मिळवून दिले. १०व्या षटकात त्याने नैबला (१८) पायचीत पकडले. नैबनंतर अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबी मैदानात आला. अश्विनने १२व्या षटकात पुन्हा गोलंदाजीला येत अफगाणिस्तानचा पाचवा फलंदाज तंबूत पाठवला. त्याने झादरानचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. ६९ धावांत अफगाणिस्तानने पाच फलंदाज गमावले. त्यानंतर कप्तान मोहम्मद नबी आणि करिम जनत यांनी अफगाणिस्तानने शतक पूर्ण केले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली, पण विजयासाठी ती अपूर्ण ठरली. अफगाणिस्तानला २० षटकात ७ बाद १४४ धावांपर्यंत पोहोचता आले. करिम जनत २२ चेंडूत ४२ धावांवर नाबाद राहिला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. भारताकडून शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर अश्विनने ४ षटकात १४ धावा देत २ बळी टिपले. या विजयासह भारताने २ गुणांची कमाई केली आहे. हेही वाचा - ‘द वॉल’ इज बॅक..! राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच; BCCIची माहिती भारताचा डाव मागील सामन्यातील फसलेल्या प्रयोगातून धडा घेत भारताने नियमित सलामीवीर सलामीवीर मैदानात उतरवले. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारतासाठी चांगली सुरुवात केली. पाच षटकात भारताने अर्धशतक ओलांडले. पॉलरप्लेनंतर भारताचा वेग थोडा मंदावला, पण रोहितने फटकेबाजी करत दबाव कमी केला. १२व्या षटकात रोहितने तर पुढच्याच षटकात राहुलने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर २४ धावांची भर घालून रोहित बाद झाला. करिम जनतने त्याला तंबूत धाडले. रोहितने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. त्याने राहुलसोबत १४० धावांची सलामी दिली. १७व्या षटकात राहुलही माघारी परतला. नैबने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. राहुलने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. या दोघांनंतर हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी सूत्रे हातात घेतली. या दोघांनी २१ चेंडूत ६३ धावांची नाबाद भागीदारी केली. जलदगती गोलंदाज हसनने टाकलेल्या २०व्या षटकात पंत-पंड्याने १६ धावा वसूल केल्यामुळे भारताला दोनशेपार जाता आले. २० षटकात भारताने २ बाद २१० धावा केल्या. हार्दिक पंड्याने १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ३५ तर ऋषभ पंतने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २७ धावा केल्या.