टी २० विश्वचषकासाठी एका महिन्याहून कमी कालावधी बाकी आहे. असं असतानाच मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग असणाऱ्या सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि ईशान किशन यांची सध्याच्या आयपीएलमधील कामगिरी पाहून निवड समितीच्या अधिकाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. हे तिघेही सध्या आयपीएलच्या उर्वरित पर्वामध्ये खेळत असून त्यांना नावाला साजेशी कामगिरी अद्याप करता आलेली नाही. निवड समितीचं टी २० विश्वचषकाच्या संघात निवड करण्यात आलेल्या खेळाडूंच्या खेळावर बारीक लक्ष आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये या खेळाडूंची कामगिरी अशीच सुमार राहिल्यास या तिघांपैकी एका खेळाडूच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते. अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अय्यरला सध्या राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलंय. मुंबईने आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये सलग तीन सामने गमावले आहेत.नक्की वाचा >> IPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB च्या चाहत्यांसाठी मात्र…मुंबई इंडियन्सने मागील पर्वामध्ये जेतेपद पटकावले होते. त्यानंतरच या संघातील अनेक खेळाडूंना निवड समितीने संधी दिली. नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि श्रीलंकन दौऱ्यामध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संघी मिळाली. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनला भारतीय एकदिवसीय संघ आणि टी २० मध्ये संधी देण्यात आली. तर राहुल चाहरला एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. याच कामगिरीच्या जोरावर तिघांना टी २० विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आलं. मात्र आता सुरु झालेल्या आयपीएल २०२१ च्या उर्वरित पर्वामध्ये ते खेळाडू संघर्ष करताना आणि मैदानामध्ये मौक्याच्या क्षणी चाचपडताना दिसत असल्याने निवड समितीचं टेन्शन वाढलंय.इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार ईशान किशनच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यासंदर्भात विचार सुरु असून या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेऊन आहे. सध्या हार्दिक पांड्याला संघामध्ये कायम ठेवण्यात येणार आहे. पुढे काय होईल हे कामगिरी ठरवेल.बीसीसीआयच्या सुत्रांनी इनसाइडस्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार टी २० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची कामगिरी सध्या चिंतेचे विषय नक्कीच आहे. मात्र आयपीएलमध्ये अजून काही सामने बाकी असल्याने हे खेळाडू पुन्हा चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघातून खेळताना चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे त्याचा जास्त चिंता करण्याची गरज नाहीय. ईशान किशननेही श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामिगीर केली होती. रविवारी विराट कोहली सामन्यानंतर ईशानशी चर्चा करताना दिसला. त्यामुळे पुढे काय होईल हे येणार काळ आणि कामगिरीच ठरवेल, असं सुत्रांनी म्हटलं आहे.नक्की वाचा >> T20 World Cup : टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा, एक दोन नाही तर तब्बल ६ खेळाडूंना मिळाली संधी ईशान आणि सूर्यकुमार चिंतेचा विषयईशानने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वामध्ये आतापर्यंत ११, १४, ९, धावा केल्या आहेत. यावेळेस आयपीएलमध्ये त्याची सरासरी १३.३७ इतकी आहे. मागील पर्वामध्ये त्याने ५७ पेक्षा अधिक सरासरीने ५१६ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवलाही सूर गवसलेला नाही. आयपीएलच्या मागील तीन खेळींमध्ये त्याने ३. ५ आणि ८ धावा केल्यात. पांड्या आणि चाहरनेही वाढवली चिंता.हार्दिक पांड्याचा फिटनेस हा सध्या भारतीय संघासाठी चर्चेचा विषय आहे. तो दुसऱ्या पर्वामध्ये मुंबईच्या तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात खेळला. त्यातही त्याने गोलंदाजी केली नाही. ८ सामन्यांमध्ये त्याने ७.८५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. राहुल चाहरने आयपीएलच्या आधीच्या पर्वात चांगली कामगिरी केलेली. मात्र दुसऱ्या पर्वामधील तीन सामन्यांमध्ये त्याला केवळ एक गडी बाद करता आलाय. मागील दोन सामन्यांमध्ये त्याने ३३ आणि ३४ धावा दिल्यात. संघात होऊ शकतो बदलबीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरकडे पर्यायी खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. एखाद्या खेळाडूबद्दल काही शंका असल्यास अय्यरला मुख्य संघात स्थान दिलं जाईल. मात्र आताच काही ठोसपणे सांगता येणार नाही. ईशान किशन हा महत्वपूर्ण खेळाडू असून सूर्यकुमारच्या कामगिरीवरही निवड समितीचं लक्ष असलं तरी शक्यतांचा विचार करण्याची गरज नाहीय, असं सुत्रांनी म्हटलंय. पांड्याची कामगिरी चिंतेचा विषय.हार्दिक पांड्याच्या फिटनेसबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. त्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वात गोलंदाजी केलेली नाही. श्रीलंकन दौऱ्यामध्येही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने या दौऱ्यामध्येही कधीच १० ओव्हरचा स्पेल टाकला नाही आणि फलंदाजीमध्येही त्यांची कामगिरी सुमार राहिलीय. त्याने दोन खेळींमध्ये १९ धावा केल्या आणि ६.९४ च्या इकनॉमी रेटने दोन विकेट्स घेतल्या. टी २० मध्ये त्याने १० धावा केल्या आणि दोन षठकांमध्ये ८.५० च्या इकनॉमी रेटने एक विकेट घेतली. पांड्याला पर्याय नाही पण.हार्दिक पांड्याला टी २० विश्वचषकामध्ये खेळता यावं म्हणून मुंबईच्या संघाकडून त्याला विश्रांती दिली जात आहे. हार्दिक नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करत असून ही भारताच्या दृष्टीने चांगील बाब आहे. रोहितला हार्दिकचं संघासाठीचं महत्व ठाऊक असल्याने बीसीसीआयला त्याची फार चिंता वाटत नाहीय असं सुत्रांनी म्हटलं आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली हार्दिकवरील वर्कलोड योग्यपद्धतीने हाताळला जाईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. हार्दिक हा टी २० विश्वचषकाच्या संघातील एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे. शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर हे चांगले पर्याय आहेत. मात्र ते नियमितपणे टी २० सामने खेळणारे खेळाडू नसून एवढ्या मोठ्या स्तरावर या दोघींनीह अद्याप स्वत:ला सिद्ध केलेलं नाही. त्यामुळेच अजून तरी निवड समितीकडून पांड्यालाच प्राधान्य दिलं जात आहे.