टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडिया निराश झाली आहे. या पराभवामुळे टीम इंडियाच्या मनोबलावर परिणाम झाला असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला प्रचंड घाम गाळावा लागणार आहे. आता यापुढचे आव्हान टीम इंडियासाठी अवघड असण्याची शक्यता आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये कमकुवत संघही बाजी मारतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कधीही काहीही होऊ शकते. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला काय करावे लागेल यावर एक नजर टाकूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडिया स्पर्धेच्या ग्रुप २ मध्ये आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि नामिबियाचे संघ आहेत. या ६ संघांपैकी फक्त २ अव्वल संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजेच उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघाला किमान ४-५ सामने जिंकावे लागतील. या व्यतिरिक्त, प्रकरण नेट रनरेटवर देखील अडकू शकते.

हेही वाचा – भारताला लाभणार ‘दिग्गज’ प्रशिक्षक? मुंबईच्या माजी क्रिकेटपटूनं केला अर्ज

भारताला आता आपला सामना न्यूझीलंडविरुद्ध पुढील रविवारी खेळायचा आहे. यानंतर ३ नोव्हेंबरला टीम इंडियाची अफगाणिस्तानशी भिडेल आणि मग भारत पहिल्या फेरीतून पात्र झालेल्या दोन म्हणजेच स्कॉटलंड आणि नामिबिया संघांशी सामने खेळेल. या दोन संघांविरुद्ध टीम इंडियाला सहज विजय मिळू शकतो, पण उर्वरित संघांविरुद्ध विजयाची शाश्वती वर्तवण्यात येत नाही. फक्त दोनच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे टीम इंडियाला फक्त त्याचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार नाहीत, तर मोठ्या फरकानेही विजय मिळवावा लागेल. अन्यथा विराटसेनेवर उपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेतून बाहेर होण्याची वेळ येईल.

गट २ मध्ये पाकिस्तान अव्वल

सध्या पाकिस्तान २ गुणांसह गट २ मध्ये अव्वल आहे. १० गडी राखून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या भारताचा नेट रन रेट -०.९७३ असा आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला आगामी सामन्यांमध्येही धावगती सुधारावी लागणार आहे. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या हातून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र असे असतानाही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup india lost against pakistan points table and semifinal equation adn
First published on: 25-10-2021 at 16:48 IST