टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाच्या लढतीची दोन्ही देशांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २४ ऑक्टोबर रोजी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ समोरासमोर असतील. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने झी न्यूजशी संभाषणादरम्यान मोठी प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा हा भारताचा इंझमाम-उल-हक असल्याचे मत अख्तरने दिले.

शोएब अख्तर म्हणाला, ”भारत हा चांगला संघ नाही, असे म्हणणारे पाकिस्तानमध्ये कोणीही नाही. ते भारतीय संघाचे उघडपणे कौतुक करतात. ते विराट कोहलीला एक महान खेळाडू आणि रोहित शर्माला त्याच्यापेक्षाही एक महान खेळाडू मानतात. रोहित शर्मा हा भारताचा इंझमाम-उल-हक असल्याचे पाकिस्तानमधील लोक म्हणतात. ऋषभ पंतची तेथे प्रशंसा केली जाते, त्याने ऑस्ट्रेलियामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली ते आश्चर्यकारक होते. त्यानंतर सूर्यकुमार यादवचे खूप कौतुक केले जाते. पाकिस्तानमध्ये भारतीय क्रिकेटबद्दल बऱ्याच सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात.”

हेही वाचा – T20 WC: आत्मविश्वास की अतिआत्मविश्वास? भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कप्तान म्हणतो, ‘‘आम्ही…”

तो म्हणाला, ”जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले, तर ते द्वेषावर आधारित नाहीत. माझा विश्वास आहे की माजी क्रिकेटपटू, ब्रँड अॅम्बेसेडर आणि मानव म्हणून माझ्या टिप्पण्यांमध्ये संतुलन असायला हवे. लोक म्हणतात, की मी कमेंट करतो. हे खरे नाही. भारतात माझे खूप चाहते आहेत. मी एक भाग्यवान पाकिस्तानी आहे, जो भारतीयांना आवडतो. यात कोणताही संदेश नाही. मी त्यांच्या किंवा माझ्या भावना दुखावू इच्छित नाही.”