टी २० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज आहे. सराव सामन्यानंतर भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. टी २० वर्ल्डकपसाठी हार्दिक पंड्याला महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. हार्दीक पंड्याला आपल्या फलंदाजीने सामना संपवावा लागणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

हार्दिक गोलंदाजी करण्यास पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे त्याला आपल्या फलंदाजीने ही कसर भरून काढावी लागणार आहे. त्याला आक्रमक फलंदाजीने सामना संपवावा लागणार आहे. “हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी १०० टक्के फिट नाही. यासाठी त्याला फलंदाजीत सामना संपवण्याची भूमिका दिली आहे. त्याच्या फिटनेसचा अंदाज घेतला जात आहे. मात्र आतातरी त्याच्याकडे एक फलंदाज म्हणून पाहिलं जात आहे. त्याने शेवटी येत सामना संपवावा. असं कित्येक वर्षे महेंद्रसिंह धोनी करत आला आहे.”, असं टीम इंडियाची सूत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.हार्दिक पंड्याची आयपीएलमधील कामगिरी हवी तशी झाली नाही. युएईत त्याने एकही चेंडू टाकला नाही. त्याचबरोबर फलंदाजीही साजेशी झालेली नाही. फलंदाजी करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. दुसरीकडे त्याची निवड भारतीय संघात झालं आहे. त्यामुळे गोलंदाजी करणार नसल्याने संघाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे.

आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी काही दिवसांचाच अवधी उरला असताना भारतीय संघात मोठा बदल केला आहे. संघात मुंबईकर अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरला १५ सदस्यीय भारतीय संघात जागा मिळाली आहे. शार्दुलने अक्षर पटेलची जागा घेतली आहे. मागील काही काळापासून शार्दुलने गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही आपली कमाल दाखवली आहे. इंग्लंड दौरा आणि त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर शार्दुलने निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले.