टी-२० विश्वचषक २०२१ चा सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये दबावाचे वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघ आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र विजय कोणाला मिळणार, यासाठी सामन्याचा निकाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू आक्रमक अंदाजात दिसले.

सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मासमवेत संघाने फोटोशूट केले. यामध्ये कप्तान कोहली आणि रोहितचा ‘अँग्री मॅन’ अवतार दिसला. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या या फोटोशूटचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला “टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची नवीन झलक”, असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, लोकेश राहुल, इशान किशन हे देखील टीम इंडियाच्या नवीन जर्सीमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा – T20 WC : ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यापूर्वी विराट म्हणतो, “पाकिस्तानचा संघ शक्तिशाली, त्यांचे खेळाडू कधीही…”

या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे राखीव खेळाडू अक्षल पटेल, श्रेयस अय्यर देखील दिसत आहेत. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ ५ वेळा आमनेसामने आले आहेत. पण प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. २०१६च्या टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यापूर्वी २०१४ आणि २०१२ मध्येही पाकिस्तानला टीम इंडियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला प्रथम साखळी आणि नंतर अंतिम फेरीत भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.