भारतीय संघ उद्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. यापूर्वी पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने ”आम्ही जिंकू” असे म्हटले होते. आता या सामन्याबाबत विराटने आपले मत दिले.

विराट कोहलीच्या मते, पाकिस्तान संघात असे अनेक खेळाडू आहेत जे सामन्याला कलाटणी देऊ शकतात. त्यामुळे त्याला आणि टीम इंडियाला जबरदस्त खेळ दाखवावा लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय व्होल्टेज सामना उद्या संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होईल.

विराट म्हणाला, ”पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. त्याच्या संघात असे काही खेळाडू आहेत, जे सामन्याचा कलाटणी देऊ शकतात. आम्ही पाकिस्तानविरुद्ध आमचा चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच दाखवू.” विराटने पाकिस्तान संघ आणि त्यांच्या काही खेळाडूंना मजबूत मानले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडिया आणखी ताकदीने मैदानात उतरणार आहे.

हेही वाचा – भारत-पाक सामना काही तासांवर आला असताना BCCIनं चार क्रिकेटपटूंना पाठवलं मायदेशी!

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने उद्याच्या सामन्यासाठी १२ खेळाडूंची घोषणा केली आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वी संघाची घोषणा करण्यास असहमती दर्शवली आहे. या संदर्भात तो म्हणाला की, ‘मी सध्या माझ्या प्लेइंग इलेव्हनबद्दल खुलासा करणार नाही. पण आमचा संघ खूप संतुलित आहे.”

पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी.