आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याचा पहिला सामना सुरू असताना अचानक एक धक्कादायक बातमी समोर आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराटने एका व्हिडिओ संदेशाद्वारे ही घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने अलीकडेच भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती आणि आता तो यंदाच्या हंगामानंतर आरसीबीचे कप्तानपद सोडेल.

आरसीबीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात विराट म्हणाला, ”आयपीएलमध्ये आरसीबीसाठी कर्णधार म्हणून हा माझा शेवटचा हंगाम असेल. मी माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत आरसीबीसाठी खेळत राहीन. चाहत्यांनी विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

विराटच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचबरोबर विराटनंतर आरसीबीचा कर्णधार कोण असेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खाली तीन क्रिकेटपटू कप्तान म्हणून विराटची जागा घेऊ शकतात.

एबी डिव्हिलियर्स

आरसीबीचा कर्णधार म्हणून एबी डिव्हिलियर्स हा उत्तम पर्याय असू शकतो. तो अनेक वर्षांपासून संघासाठी खेळत आहे आणि सध्याचा कर्णधार विराट कोहलीशी त्याचा संबंधही खूप चांगला आहे. डिव्हिलियर्स २०११ पासून आरसीबीकडून खेळत आहे आणि फ्रेंचायझीचे वैशिष्ट्य बनले आहे. त्याच्यामुळे संघाची लोकप्रियता खूप जास्त आहे. याशिवाय त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदाचा अनुभव आहे आणि या कारणामुळे तो एक महान कर्णधार म्हणून सिद्ध होऊ शकतो.

ग्लेन मॅक्सवेल

ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा जबरदस्त फलंदाज आहे. मॅक्सवेलला टी-२० चा भरपूर अनुभव आहे आणि त्याने अनेक संघांचे कर्णधारपदही भूषवले आहे. मॅक्सवेलने बिग बॅश लीगचे कर्णधारपदही भूषवले आहे आणि बीबीएलच्या टीम ऑफ द टूर्नामेंटचा कर्णधार म्हणूनही त्याची निवड झाली आहे. ग्लेन मॅक्सवेलने यापूर्वी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चे कर्णधारपदही भूषवले आहे. अशा परिस्थितीत, त्याला एक चांगला अनुभव आहे आणि तो अनेक वर्षे संघाचे नेतृत्व करू शकतो आणि कर्णधारपदासाठी तो उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा – RCB vs KKR : आज निळ्या रंगाच्या जर्सीत का खेळतेय विराटसेना?; जाणून घ्या कारण

देवदत्त पडिक्कल

जर आरसीबी भविष्यासाठी आपली टीम तयार करू पाहत असेल तर देवदत्त पडिक्कलपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. देवदत्त अजूनही एक तरुण खेळाडू आहे आणि येत्या अनेक वर्षांपासून आरसीबीकडून खेळू शकतो. विराट कोहली त्याला कर्णधार म्हणून तयार करू शकतो.