टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिल्या पदकाची कमाई करणाऱ्या वेटलिफ्टर मिराबाई चानूला यशाचं शिखर गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. मणिपूरच्या इंफाळमधील स्पोर्ट्स अकॅडमी घऱापासून २५ किमीपेक्षा जास्त अंतरावर होती. रोज प्रवासाचा खर्च परवडणारा नसल्याने मिराबाई नदीतील रेती इंफाळला वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांकडून लिफ्ट मागत प्रवास करायची. कित्येक वर्ष ट्रकचालक मिराबाईला प्रवासासाठी मदत करत होते. यामुळेच गुरुवारी आपल्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या या ट्रकचालकांप्रती मिराबाई चानूने आदर व्यक्त करत त्यांचा सत्कार केला. मिराबाई चानूने ट्रकचालक आणि हेल्पर्सना शर्ट, मणिपूरा स्कार्फ आणि जेवण देत त्यांचे आभार मानले.

Tokyo 2020: “मी दोन दिवस काहीच खाल्लं नव्हतं”; मिराबाई चानूने केला खुलासा

जर ट्रकचालकांनी आपल्याला प्रवासात मदत केली नसती तर वेटलिफ्टर होण्याचं आपलं स्वप्न कदाचित अपूर्ण राहिलं असतं असं मिराबाई सांगते. वेटलिफ्टर मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं आहे. मिराबाई चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली. कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरं पदक आहे. भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले. भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले.

एका जिद्दीची कहाणी!

मिराबाईने आपल्या या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं तसंच अनेक गोष्टींचं बलिदान द्यावं लागल्याचं एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे. “एक मोठा खेळाडू होण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींचं बलिदान द्यावं लागतं आणी मी ते केलं आहे,” असं मिराबाईने म्हटलं आहे.

आईने विकले होते दागिने

मिराबाईची वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द घडावी, म्हणून पाच वर्षांपूर्वी तिच्या आईने आपले दागिने विकले होते. ऑलिम्पिकमध्ये रुपेरी यश मिळवताना मिराबाईच्या आईचे पाठबळ सहज लक्ष वेधत होती. आईने भेट म्हणून दिलेले ऑलिम्पिकच्या पंचवर्तुळांचे कानातले तिने या वेळी परीधान केले होते. त्यामुळे आई सैखोम ओंगबी टोंबी लेईमाला आपले अश्रू आवरणे कठीण गेलं होतं. ‘‘२०१६च्या रिओ ऑलिम्पिकआधी हे कानातले मी मिराबाईला दिले होते. तिला यश मिळावे यासाठी मी ते सोन्याचे बनवले होते. तिने मिळवलेले पदक पाहताना मी आणि माझे पती आनंदाश्रूंत न्हाऊन गेलो. मेहनतीचे चीज झाले,’’ अशी प्रतिक्रिया तिच्या आईने व्यक्त केली होती.

दोन दिवस काहीच खाल्लं नव्हतं

मिराबाईने एनडीटीव्हीशी बोलताना ऑलिम्पिकच्या दोन दिवस आधी आपण काही खाल्लं नव्हतं अशी माहिती दिली होती. वजन वाढण्याची भीती असल्याने आपण काहीच खाल्लं नव्हतं असं तिने सांगितलं होतं. “मी दोन दिवस काहीच खाल्लं नाही कारण मला माझ्या वजनाची चिंता होती,” असं सांगताना रौप्यपदक विजेच्या मिराबाई चानूने कडक डाएट पाळण्यामुळे आपल्याला कशा पद्दतीने प्रेरणा मिळाली आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या अपयशानंतर याचा कसा फायदा झाला याबद्दल सांगितलं होतं.

४९ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणाऱ्या मिराबाईने यावेळी वजनावर नियंत्रण ठेवताना येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितलं. “हे फार कठीण आहे. आम्हाला वजन वाढू नये यासाठी फार कडक डाएट पाळावा लागतो. यामुळे मी जंक फूड खाऊ खकत नाही. मर्यादित गोष्टींचंच सेवन करु शकत होते,” असं मिराबाईने सांगितलं होतं.