टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत दमदार वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी अखेर कोट्यवधी भारतीय चाहत्यांना कांस्यपदकाचा नजराणा दिला. जगज्जेत्या सिंधूने कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या ही बिंग जियाओला नेस्तनाबूत करून ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरण्याचा मान मिळवला. या यशानंतर बॅडमिंटपटू पी.व्ही. सिंधू यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर सर्वांचं आभार मानणारं पत्रक शेअर केलं आहे.

“तुम्ही दिलेल्या समर्थनाचे मनापासून स्वीकार करते. हे सर्व पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचं आहे. हे पदक माझ्यासाठी सर्वकाही आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधला अनुभव मी विसरू शकत नाही. या क्षणासाठी मी पाच वर्ष तयार होत होती. ऑलिम्पिक पदक स्वीकारताना झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझं स्वप्न सत्यात उतरल्यासारखंच आहे. हा विजय माझ्या एकटीता नाही. ज्यानी मला इथपर्यंत प्रवासात मदत केली, त्या सर्वांचा आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. हा प्रवास इथे थांबणार नाही.”, अशी पोस्ट पी. व्ही. सिंधू हिने शेअर केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने कांस्य पदक पटकावलं. कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला. या विजयानंतर पी. व्ही. सिंधूवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.