मुंबई, धरमशाला, पुद्दुचेरीत रणजी करंडकाचे सामने होण्याची शक्यता दोन टप्प्यांत होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात साखळी सामने विभागीय पद्धतीने किंवा त्रयस्थ ठिकाणच्या जैव-सुरक्षा परिघात मागील स्पर्धेचे सूत्र वापरून खेळवण्यात येतील. या सामन्यांसाठी मुंबई, धरमशाला आणि पुद्दुचेरी हे पर्याय उपलब्ध आहेत. लांबणीवर पडलेली रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे, अशी घोषणा ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी केली. ३८ संघांचा सहभाग असलेली रणजी स्पर्धा १० फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी करोनाच्या साथीमुळे रणजी स्पर्धा रद्द झाली होती, तर यंदा १३ जानेवारीपासून स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात आली; परंतु करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ती पुढे ढकलण्यात आली़ दोन टप्प्यांत होणाऱ्या रणजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात साखळी सामने होतील. या टप्प्यासाठी संघांच्या प्रवासाचा धोका कमी करण्यासाठी विभागीय पद्धत वापरता येईल. अन्यथा, त्रयस्थ ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरणात संघांचे विभाजन करून सामने होतील. रणजी स्पर्धेकडे दुर्लक्ष नको -शास्त्री नवी दिल्ली : रणजी करंडक क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय क्रिकेट कणाहीन होईल, असे मत माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘‘रणजी करंडक स्पर्धा ही भारतीय क्रिकेटचा पाया आहे. या स्पर्धेकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील,’’ असा इशारा शास्त्री यांनी दिला आहे.