जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली त्याच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या टीम इंडिया इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे आणि विराट संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीनेही विराटच्या आक्रमक वृत्तीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. गांगुली म्हणाला, ”विराटला आव्हान देणे योग्य नाही, तो शर्टशिवाय ऑक्सफर्ड स्ट्रीटपर्यंत जाऊ शकतो.” टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC १३) च्या एका भागात गांगुलीने ही प्रतिक्रिया दिली.

२००२मध्ये नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर तत्कालीन कर्णधार गांगुलीने त्याची जर्सी काढली. लॉर्ड्स स्टेडियमवर तो जर्सी उतरवून आनंद साजरा करताना दिसला. या संस्मरणीय सामन्याला १९ वर्षे झाली. तरीही गांगुलीच्या त्या सेलिब्रेशनबद्दल आठवण काढली जाते. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या भागात या घटनेचा उल्लेख केला.

हेही वाचा – आता काय करणार इंग्लंड? भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान मिळाली ‘चिंता’ वाढवणारी बातमी!

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी गांगुलीला या सेलिब्रेशनबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “माझ्या मुलीने ते एकदा पाहिले आणि मला विचारले की मी ते का केले? मला वाटते, की मी २०,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि बरेच कव्हर ड्राइव्ह शॉट्स खेळले आहेत, परंतु प्रत्येकजण त्या सेलिब्रेशनबद्दल चर्चा करत असतात.”

गांगुली पुढे म्हणाला, ”सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीला याबाबत काही बोलू नका. तो शर्टशिवाय ऑक्सफर्ड स्ट्रीटवर जाऊ शकतो. विराटला आव्हान देऊ नका.”