विराट कोहलीला कर्णधारपद सोडायला भाग पाडलं असं विधान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने काल केलं. गेल्या वर्षी विराट टी-२० कर्णधारपदावरून पायउतार झाला, त्यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं. गेल्याच आठवड्यात विराटने कसोटी सामन्यांचं कर्णधारपदही सोडलं. गेले सात वर्ष त्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. याचसंदर्भात शोएब अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. शोएब अख्तर सध्या लिजंड्स लिग क्रिकेटमध्ये सहभागी झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, विराटने कर्णधारपद सोडलं नाही. त्याला ते सोडण्यासाठी भाग पाडण्यात आलं आहे. मला माहित होतं की जर त्यांनी टी-२० विश्वचषक जिंकला नसता तर खूप मोठी समस्या निर्माण झाली असती आणि तसंच झालं. विराटच्या विरोधात एक गट आहे, काही जण त्याच्या विरोधात आहेत. आणि हेच कारण आहे त्याने कर्णधारपद सोडण्याचं. आता जर त्याने कर्णधारपद सोडलंच आहे तर आता त्याने जास्त मेहनत घेण्याऐवजी कठोर मेहनत घ्यावी आणि आपल्या नैसर्गिक खेळीमध्ये खेळावं. https://twitter.com/ANI/status/1485052612240355332?t=BRjgY_aVHu4rpPV3XA5M-Q&s=08 शोएब अख्तर पुढे म्हणाला, कर्णधारपद सांभाळणं सोपं काम नाही. तुम्हाला इतरही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. त्या कामामुळे ताणही येतो. आता असंही त्याने कर्णधारपद सोडलं आहे तर त्याने खेळाचा आनंद घ्यावा. तो खूप चांगला खेळाडू आहे, त्याला आता फक्त याची जाणीव व्हायला हवी, त्याने आपली किंमत वाढवावी. जेव्हा एखादा खेळाडू स्टार बनतो, तेव्हा त्याला नेहमीच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण घाबरून जाण्यासारखं काही नाही. अनुष्का (विराटची पत्नी) चांगली व्यक्ती आहे आणि विराटही चांगला माणूस आणि उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यांना आता फक्त निर्भय व्हायचं आहे, कोणत्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही. सगळा देश त्यांच्यावर प्रेम करतो. सध्याचा काळ त्यांची परीक्षा पाहतो आहे. त्यांनी आता खंबीरपणे यातून बाहेर यायला हवं. हेही वाचा - मुंबई, पुण्याला ‘आयपीएल’साठी प्राधान्य!; ‘बीसीसीआय’च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; २७ मार्चपासून स्पर्धा रंगण्याची शक्यता आता यापुढे भारताचा कर्णधार कोण असेल याविषयी विचारल्यावर अख्तर म्हणाला, मला माहित आहे, याविषयी जो निर्णय घ्यायचा तो BCCI अगदी विचार करून हुशारीने घेईल.